मुंबई: मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराती समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे, असं वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादीनं कोश्यारींच्या विधानाचा कडक शब्दांत निषेध केला. त्यांच्यावर सडकून टीका केली. त्यानंतर आता भाजपची प्रतिक्रिया आली आहे.

भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करून कोश्यारींच्या विधानाबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे. ‘राज्यपाल महोदयांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसाच्या परिश्रमातून, घामातून आणि हौतात्म्यातून उभी राहीली आहे. आमचा तेजस्वी इतिहास पानोपानी हेच सांगतो. त्याला कुणीही कुठल्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करु नये,’ अशा शब्दांत शेलार यांनी पक्षाची भूमिका मांडली.

चौफेर टीकेनंतर कोश्यारींकडून स्पष्टीकरण
काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता, असं स्पष्टीकरण कोश्यारी यांनी दिलं. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभं केलं. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचं योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही, असं कोश्यारी यांनी म्हटलं.
मराठी माणसाला डिवचू नका! राज्यपालांचा समाचार; राज ठाकरेंनी ‘कोश्यारींची होशियारी’ काढली
नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो. कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे, असं कोश्यारी म्हणाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here