पुणे: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची धाड पडली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांचं पथक सकाळी ७ च्या सुमारास संजय राऊतांच्या मुंबईतील घरी सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षेसह दाखल झालं. गेल्या ६ तासांपासून राऊत यांची चौकशी सुरू आहे. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी ईडीकडून चौकशी केली जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीनं ईडीच्या कारवायावर टीकेची झोड उठवली असताना विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मोघम प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांच्या घरावर ईडीनं छापा टाकल्याची बातमी मला माध्यमांमधूनच समजली. पाठीमागच्या काळात ईडीच्या नोटिसा अनेकांना आल्या. ईडी असो वा सीबीआय किंवा आयटी, या सगळ्या संस्थांना तपासाचे अधिकार आहेत. या संस्था स्वायत्त असतात, असं अजित पवार म्हणाले. ईडी संजय राऊतांना वारंवार चौकशीसाठी का बोलावते, त्यांना समन्स का बजावते, यावर संजय राऊतच अधिकारवाणीनं बोलू शकतील, असं पवारांनी म्हटलं. महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेनेच्या खासदाराच्या घरावर धाडी पडत असताना पवारांनी कारवाईचा निषेधही केला नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अर्जुन खोतकर इतका घाबरट कधीपासून झाला? रामदास कदमांचा आक्रमक पवित्रा
एकीकडे अजित पवार ईडीच्या कारवाईचा निषेध करत नसताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे आमदार अमोल मिटकरींनी भाजपवर सडकून टीका केली. संजय राऊत यांच्या घरावर ईडीनं धाड टाकल्यानं शिंदे गटातील काहींच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. भाजपनं ईडीचा धाक दाखवूनच त्यांना स्वत:कडे ओढून घेतलं. मात्र बाळासाहेब ठाकरे यांचे कडवे शिवसैनिक असलेले संजय राऊत ईडीपुढे झुकले नाहीत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली.

ईडीच्या कारवायांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी अनेक नेते भाजपसोबत गेले. शिवसेनेचे आमदार फुटले. मात्र या संकट काळातही राऊत पक्षासोबत राहिले. त्यांनी पक्ष नेतृत्त्वाची साथ सोडली नाही. ही बाब महाराष्ट्र विसरणार नाही. राऊतांनी ईडीसमोर गुडघे टेकले नाहीत. अनेक आमदार पक्ष सोडून गेले असतानाही राऊत यांनी एकहाती किल्ला लढवला, याची दखल इतिहासात घेतली जाईल, असं मिटकरी म्हणाले.
पाय ठेऊ देणार नाही! शिंदे गटातील नेत्याला दानवेंचा धक्का; इतिहासाचा दाखला देत दाजींचा हिसका
राऊतांच्या घरावर धाड पडली असताना अमोल मिटकरी यांनी एक वेगळाच योगायोग सांगितला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबद्दल, मराठी माणसाबद्दल केलेल्या विधानावरून प्रचंड गदारोळ झाला. राज्यपालांविरोधात वातावरण तापलं. त्यांच्यावर असलेला रोष कमी व्हावा, लोकांचं लक्ष दुसरीकडे वेधलं जावं यासाठी ईडीनं सकाळी राऊतांच्या घरावर धाड टाकली, याकडे मिटकरींनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here