शिवसेनेचे फायरब्रँड नेते, ज्यांनी गेली अडीच वर्ष महाविकास आघाडीची, शिवसेनेची बाजू ठामपणे मांडली, उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवरचा प्रत्येक बाण परतावून लावला, ठाकरेंवरच्या प्रत्येक आरोपाला बिनतोड उत्तर दिलं, त्याच संजय राऊतांवर आज कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीने आज ताब्यात घेतलं. सुमारे ९ तासांच्या चौकशीनंतर राऊतांना घेऊन ईडीचे अधिकारी मुंबईतील फोर्टच्या ईडी कार्यालयात पोहोचले. सध्या ईडीच्या अधिकाऱ्यांकडून राऊतांची चौकशी सुरु असल्याचं कळतंय.
केदार दिघे म्हणतात…..
“ना डर, ना सत्तेचा लोभ, ना मला वाचवा अशी भीक मागितली…तो योध्दा निडरपणे चालला, शिवसेनेचा आणि महाराष्ट्राचा मराठी बाणा जोपासण्यासाठी…! दिल्ली समोर झुकणार नाही, जे घाबरून पळाले ते शिवसैनिक असू शकत नाहीत…”
संजय राऊत-ईडीच्या अधिकाऱ्यांमध्ये तू तू मैं मैं
कथित पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणात संजय राऊत यांची आज सकाळी सकाळी सात वाजल्यापासून त्यांच्या भांडूप येथील मैत्री निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. ईडीचे अधिकारी दारात आल्यानंतर संजय राऊतांनी त्यांना घरी येण्याचं कारण विचारलं. संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर मी चौकशीला येतो, असं सांगूनही तुम्ही आज येण्याचं कारण काय?, असा सवाल त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना विचारला. त्यावर अधिकाऱ्यांनी राऊतांना छापेमारीचं कारण सांगितलं. तुम्ही ईडीला सहकार्य करत नसल्याने आज आम्ही चौकशीसाठी आलो आहोत, असं उत्तर ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलं. दरम्यान संजय राऊत आणि ईडीच्या अधिकाऱ्यांमध्ये सुमारे अर्धा तास तू तू मैं मैं झालं. अखेर ईडीचे अधिकारी राऊतांच्या घरात पोहोचले अन् चौकशीला सुरुवात केली.
राऊतांचा ‘झुकेगा नहीं’चा नारा
चौकशी सुरु असतानाही संजय राऊत यांचे मनोबल थोडेही खच्ची झाल्याचे दिसत नाही. कारण, ही चौकशी सुरु असतानाच संजय राऊत यांनी काही ट्विटस केली. या ट्विटसमध्ये संजय राऊत यांनी, ‘खोटी कारवाई..खोटे पुरावे. मी शिवसेना सोडणार नाही.. मरेन पण शरण जाणार नाही. जय महाराष्ट्र, असे म्हटले आहे. राऊतांच्या या एकूण ट्विटसचा सूर पाहता संजय राऊत हे ईडीसमोर सहजासहजी शरण जातील, असे दिसत नाही.
संजय राऊत ट्विट्समध्ये आणखी काय म्हणाले?
कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. मी शिवसेनेसाठी लढत राहीन. मरेन पण शरण जाणार नाही. मी शिवसेना सोडणार नाही. महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील, असे संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.