या कार्यक्रमात एका बाईने अमृता फडणवीस यांना थेट, ‘तुम्ही चेहऱ्याची प्लॅस्टिक सर्जरी केलेय का ओ मॅडम?’, असा प्रश्न विचारला. त्यावर एकच हशा पिकला. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी म्हटले की, चांगलं झालं तुम्ही मला हा प्रश्न विचारलात. मला यावरुन अनेक लोक सोशल मीडियावर ट्रोल करतात. प्लॅस्टिक सर्जरी ही खूप महागडी गोष्ट आहे. त्यामध्ये मोठा धोका असतो. काही बिघडलं तर तुमच्या चेहऱ्याची सगळी फिचर्स बिघडू शकतात, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले.
तसेच अमृता फडणवीस यांनी मी लग्नापूर्वी एकदाही ब्युटी पार्लरमध्ये गेली नव्हते, असेही सांगितले. फक्त लग्नाच्यावेळी जो मेकअप करतात, तेवढाच मी केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी माझा चेहरा महत्त्वाचा नाही. ते स्त्रीचा चेहरा किंवा बाकी काही पाहत नाहीत, तर तिचं मन पाहतात, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.
‘गळ्यात मंगळसूत्र घातलं नाही तर सासूबाई ओरडत नाहीत का?’
या कार्यक्रमात एका बाईने अमृता फडणवीस यांना विचारले की, ‘ तुम्ही गळ्यात मंगळसूत्र घातलं नाही तर सासूबाई ओरडत नाहीत का?’ त्यावर अमृता फडणवीस यांनी आपली भूमिका मांडताना म्हटले की, मंगळसूत्र हे सौभाग्याचं प्रतिक आहे. ते गळ्यात घातलं तर पतीने तुमचा गळा पकडला असतं वाटतं, त्यामुळे मी मंगळसूत्र हातात घालते. त्यामुळे देवेंद्रजींनी सतत माझा हात धरला आहे, असे मला वाटते. तुम्ही मंगळसूत्र गळ्यात घातलंय म्हणून नवऱ्याने तुमचा गळा पकडलाय, असं तुम्हाला वाटत असेल, अशी मिश्कील टिप्पणी अमृता फडणवीस यांनी केली.