मुंबई: गेल्या महिनाभराच्या काळात ठाकरे सरकारने घेतलेले अनेक निर्णय बदलण्याचा सपाटा शिंदे-फडणवीस सरकारने लावला आहे. यामध्ये आता आणखी एका निर्णयाची भर पडली आहे. ठाकरे सरकारच्या काळात परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्यावरील खंडणीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक(एसआयटी) नेमण्यात आली होती. त्यावेळी या प्रकरणाशी संबंधित असलेल्या अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि निलंबन करण्यात आले होते. त्यापैकी निलंबित डीसीपी पराग मणेरे (Parag Manere) यांना पुन्हा पोलीस सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात गृहखात्याकडून आदेश काढण्यात आला आहे. पराग मणेरे हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त होते. परमबीर सिंह खंडणीप्रकरणात त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले होते. मात्र, नवे सरकार येताच गृहखात्याने पराग मनेरे यांना पुन्हा सेवेत सामावून घेतले आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारचे निर्णय फिरवण्याची मालिका सुरुच ठेवली आहे. यावर आता महाविकास आघाडीच्या गोटातून काय प्रतिक्रिया येतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ( Mumbai Police Officer suspended in Thackeray govt tenure restore in Police service)
शिवसेना फुटताच शिष्यही दुरावला, WhatsApp ग्रुपमधून नीलमताई गोऱ्हेंना केलं रिमूव्ह

नेमकं प्रकरण काय?

बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीनुसार २२ जुलैला मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात परमबीर सिंह, अकबर पठाण यांच्यासह सहायक पोलिस आयुक्त श्रीकांत शिंदे, संजय पाटील, निरीक्षक आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, बांधकाम व्यावसायिक सुनील जैन आणि संजय पुनमिया यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस उपायुक्त निमीत गोयल यांच्या नेतृत्त्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले होते. त्यानंतर या गुन्ह्यात आरोपी असलेल्या दोन उपायुक्त, दोन सहायक पोलिस आयुक्त आणि एका निरीक्षकाची बदली सशस्त्र विभागात करण्यात आली होती. यामध्ये पराग मणेरे यांचा समावेश होता. तर गुन्हे शाखेचे उपायुक्त अकबर पठाण, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील, सिद्धार्थ शिंदे आणि पोलिस निरीक्षक आशा कोरके यांची सशस्त्र विभागात बदली करण्यात आली होती. अशा परिस्थिती नेमणुकीच्या ठिकाणी कार्यरत ठेवणे प्रशासकीय दृष्टीकोनातून योग्य ठरणार नसल्याने त्यांची बदली केली जात असल्याचे आदेशात म्हटले होते.
डोंबिवलीत शिंदे गट-ठाकरे गट भिडले, शिवसेना शाखेची अखेर फाळणी

गृह विभागाच्या नव्या आदेशात काय म्हटले आहे?

ज्याअर्थी, श्री. पराग शाम मणेरे, अपर पोलीस अधीक्षक, उत्पादन शुल्क, नागपूर यांना त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्हा नोंद क्रमांक १०५/२०२१ बाजारपेठ पोलीस ठाणे, कल्याण व गुन्हा नोंद क्रमांक १७६/२०२१ कोपरी पोलीस ठाणे, ठाणे येथे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने संदर्भाधीन क्रमांक १ येथील शासन आदेशान्वये निलंबित करण्यात आले होते. त्यांना शासन सेवेत पुनःस्थापित करण्याची शिफारस सक्षम प्राधिकारी यांना करण्यात आली होती. त्यास सक्षम प्राधिकारी यांनी मान्यता दिली आहे.

पराग शाम मणेरे, निलंबित अपर पोलीस अधीक्षक यांना त्यांच्याविरुद्धच्या दाखल गुन्ह्यांच्या प्रकरणी मा. न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून तसेच त्यांच्याविरुद्धच्या प्रलंबित विभागीय चौकशीच्या निर्णयाच्या अधीन राहून या आदेशान्वये या आदेशाच्या दिनांकापासून शासन सेवेत पुनःस्थापित करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here