सचिवांना अधिकार देऊन दोघे `टिकोजीराव` दिल्ली वाऱ्या करीत आहेत. हा कसला कारभार? या शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. या दोघांनी राज्यात लोकशाहीचा खून केला, असा आरोपही पवार यांनी केला. (ajit pawar criticizes cm eknath shinde and devendra fadnavis)
पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने `निर्धार महाविजयाचा, संवाद कार्यकर्त्यांचा` मेळाव्याचे चिंचवड येथे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. राज्यात गेल्या ३५ दिवसांपासून दोघेच जण कारभार करीत आहेत, असे नमूद करून पवार म्हणाले, `मंत्रिमंडळ स्थापन करण्यात का विलंब होत आहे? तेच समजत नाही. फुटलेल्या आमदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करता येत नसावी, अशी शंका मनात येते. दोघांनी पदे घ्यायची. दिल्ली वाऱ्या करायच्या आणि बाकीच्यांनी वाट पहायची. हा कसला कारभार?`
सर्व विभागाच्या मंत्र्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या संबंधित सचिवांकडे सोपवल्या बाबतचा आदेश मुख्यमंत्र्यांनी चार ऑगस्टला काढला. त्यानंतर आज सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, हे काय चालले आहे? असा उपस्थित करून पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकार लोकशाहीचा खून करीत आहे, असा आरोप केला. मंत्रालयाचे नाव सचिवालय करा, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर घ्या, असे कोर्टाचे आदेश असताना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री एकत्र बसून निर्णय घेतात. संभ्रमावस्था निर्माण करतात, हे योग्य नाही, असे नमूद करून पवार म्हणाले, `जनतेमधून नगराध्यक्ष निवडले जातात. भविष्यात महापौर, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान देखील जनतेमधून निवडून द्या, असे म्हणाल. पण लक्षात घ्या, कोणी सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. सत्तांतर होत असते. लोक आता गप्प आहेत. परंतु, संधी मिळताच कोणते बटन दाबतील? कळणार नाही. चुकीच्या पद्धतीने कारभार करणाऱ्यांना जनतेने घरी बसवल्याचे आपल्या लोकशाहीने सिद्ध केले आहे.`
मावळमध्ये लहान मुलीवर अत्याचार झाला. तिचा खून करण्यात आला. गुन्हा आरोपीने कबूल केला. अशा नराधमांना आठ दिवसांत फाशी द्यायला हवी, अशी माझी इच्छा आहे. मात्र, सरकारला वेळ नाही, याकडे पवार यांनी लक्ष वेधले. तपास यंत्रणेचा वापर कशाप्रकारे केला जातो, हे कळायला जनता दुधखुळी नाही, असे पवार यांनी नमूद केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नऊ दिवसांवर आला असताना सरकारी पातळीवर तयारी नाही. जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री नाहीत, अशी परिस्थिती किती दिवस ठेवणार? याचा पुनरुच्चार पवार यांनी केला.
पालिकेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी होतील, त्यामुळे कार्यकर्त्यांनी गाफील राहू नका, असा सल्ला पवार यांनी मेळाव्यात दिला. पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, संजोग वाघेरे-पाटील, आझमभाई पानसरे, भाऊसाहेब भोईर, कविता आल्हाट, सुनील गव्हाणे, वर्षा जगताप, विशाल वाकडकर या वेळी उपस्थित होते.
अजित पवारांचे खडे बोल
> मंत्रिमंडळ विलंबाचे कारण तरी काय?
> उपमुख्यमंत्री बिनखात्याचे मंत्री कशासाठी?
> लोकांमधून मुख्यमंत्री, पंतप्रधान निवडणार का?
> तुमचे `मंत्रिमंडळ लवकर` येणार तरी कधी?
> प्रशासनाला अधिकार देऊन तुम्ही घरी बसता का?
> कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आमचा?
‘आपद्ग्रस्तांच्या प्रश्नांबाबत गांभीर्य नाही’
`राज्यात अतिवृष्टी भागातील आपद्ग्रस्तांचे प्रश्न आहेत. शेतकरी हवालदिल आहेत. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लेखी अहवाल दिला आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. गांभीर्याने दखल घेतली जात नाही. पावसाळी अधिवेशन बोलवा. आमदारांना त्यांच्या भागातील प्रश्न उपस्थित करू द्या, असे वारंवार सांगूनही उपयोग होत नाही,` अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.