कल्याण : शिक्षणासाठी हजारो किलोमीटर दूर कळव्यातील एका मदरशात आलेल्या मुलांना तेथे मारहाण करून त्यांच्याकडून काम करून घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या त्रासाला कंटाळून पाच मुलांनी तेथून पळ काढला. मात्र, महिला रेल्वे प्रवाशाच्या सतर्कतेमुळे रेल्वे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मुलांच्या तक्रारीवरून डोंबिवली रेल्वे पोलिसांनी मदरशामधील दोन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला. हा गुन्हा कळवा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

ठाण्याकडून कल्याणकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये कळवा स्थानकात १ ऑगस्ट रोजी ८ ते १० वयोगटातील पाच उत्तर भारतीय मुले प्रवास करत होती. या मुलांच्या चर्चेतून त्यांना पळून घरी जायचे असल्याचे त्याच डब्यातून प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाच्या लक्षात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी रेल्वे पोलिस हेल्पलाइनशी संपर्क साधत याबाबत माहिती दिली.

विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मतदान करणाऱ्या काँग्रेस आमदारांची यादी तयार; मतफुटीचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे

रेल्वे पोलिसांनी डोंबिवली स्थानकात या पाच मुलांना उतरवले आणि त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी ही सर्व मुले बिहारमधील असल्याचे समोर आले. त्यांच्या पालकांनी त्यांना शिक्षण घेण्यासाठी कळवा येथील मदरशात पाठवले होते. मात्र त्या ठिकाणी त्यांना मारहाण करत काम करून घेतले जात होते. याला कंटाळून त्यांनी तेथून पळ काढला. रेल्वे पोलिसांनी या मुलांना ‘चाइल्ड वेल्फेअर कमिटी’समोर हजर केले असता कमिटीने या मुलांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना उल्हासनगरमधील बालसुधारगृहात पाठवले. तसेच त्यांच्या पालकांशी संपर्क केला.

दरम्यान, या प्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्यात मदरशातील दोन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here