मुख्यमंत्री कावड यात्रेसाठी हिंगोलीत येणार आमदार संतोष बांगर यांनी जोरदार तयारी केली होती. नांदेडचे कार्यक्रम आवरुन मुख्यमंत्र्यांचं ठरल्याप्रमाणे हिंगोलीत आगमन झालं. बांगरांनीही मुख्यमंत्र्यांचं दणक्यात स्वागत केलं. १५१ किलो खोबऱ्याचा हार घालून, पुष्पवृष्टी करत बांगरांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. मुख्यमंत्र्यांनीही बांगर माझा ढाण्या वाघ असल्याचं सांगत उपस्थितांमध्ये जान भरली. भाषण सुरू होण्यापूर्वी व्यासपीठावर धनगर समाज, बंजारा समाज, यांच्यासह इतर समाज बांधव पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील गांधी चौक येथे आयोजित सभेत जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी आमदार संतोष बांगर यांचे तोंडभरून कौतुक केले. संतोष बांगर हा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा ढाण्या वाघ आहे. तिकडे राहून एक-एक आमदार पाठवत होता, असं पहिल्यांदाच थेटपणे सांगून मुख्यमंत्र्यांनी गुपित फोडलं.
विरोधकांना आपण आपल्या कार्यातून उत्तर देणार आहोत. मी जिथे जातोय तिथे हजारोंच्या संख्येने नागरिक सत्कार करण्यासाठी रस्त्यावर येत आहेत. स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्वप्नातलं हे सरकार आहे. अडीच वर्षांपूर्वीच हे सरकार स्थापन व्हायला होतं. शिवसेना भाजपा युतीसाठी जनतेने भरभरून मतदान दिलं होतं, सेना भाजप युतीचे सरकार येईल ही जनतेची अपेक्षा होती. ज्या लोकांना बाळासाहेबांनी कधी जवळ उभं केलं नाही, त्यांच्यासोबत सरकार स्थापन केलं हे दुर्दैवी आहे. आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचं काम करतोय, हिंदुत्व पुढे नेण्याचं काम करतोय. मग आमचं काय चुकतंय?, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी विचारला.
कावड यात्रेचं महत्त्व
विविध नद्यांमधून पाणी आणायचं आणि त्याचा शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचा. कावडीतून पाणी आणताना पिंडीतून अभिषेक होईपर्यंत कावड खाली ठेवायची नाही, असा नियम आहे. परशुरामाने ही यात्रा सुरु केली, अशी आख्यायिका आहे. हजारो शिवभक्त या कावड यात्रेत सहभागी होत असतात. कळमनुरी येथून ही यात्रा हिंगोलीकडे मार्गस्थ झालीये. यंदाच्या साली या यात्रेत संतोष बांगर सहभागी झाले होते. ‘हर हर महादेव’ आणि ‘बम बम भोले’चा जयघोष आसमंतात निनादत होता.