आज रात्री किंवा उद्या धरण १०० % भरणार
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या अतिवृष्टी सुरू आहे. यामुळे राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण सध्या ९०.०७ टक्के भरले असून १६०० क्युसेक्सचा पाण्याचा विसर्ग सध्या विद्युत विमोचनमधून सुरू आहे. राधानगरी धरणाचे दरवाजे हे स्वयंचलित आहेत. धरण १०० % भरल्यास धरणाचे दरवाजे आपोआप उघडतात. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सुरू असून धरणामध्ये पाण्याची आवक मोठया प्रमाणात सुरु असल्यामुळे आज रात्री उशिरा किंवा उद्या दिवसभरात राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळी मध्ये मोठया प्रमाणात वाढ होऊ शकते. यामुळे नदीकाठावरील नागरिक तसेच स्थानिक प्रशासन यांनी सतर्कता बाळगावी असे जलंपदा विभागाकडून सांगण्यात आले आहे.
पंचगंगा नदी पात्रा बाहेर
कोल्हापूर जिल्ह्यातही दमदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे पंचगंगा नदी पात्राबाहेर पडले आहे. आज ७ वाजेपर्यंत राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ३४ फूट ४ इंच इतकी आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट व धोका पातळी ४३ फूट आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गेल्या २४ तासांत पंचगंगेच्या पाणीपातळीत तब्बल १३ ते १४ फुटांनी वाढ झाली असल्याने नागरिकांना पुन्हा महापुराची भीती वाटू लागली आहे. तर दुधगंगा धरणाचे सांडव्यावरील ५ वक्राकार दरवाजे उघडले असून त्यातून ४२३ क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. पॉवर हाऊसमधून १ हजार क्युसेक्स असा एकूण १ हजार ४२३ क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे. याबाबत पाटबंधारे विभागाने माहिती दिली आहे.
अनेक भागात दरडी कोसळल्या, पाणी आल्याने रस्ते बंद
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने अनेक भागात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. तर अनेक रस्त्यावर आणि बंधाऱ्यांवर पाणी आल्याने रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्र व मुक्त पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व शासकीय यंत्रणांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, आपल्या आसपास आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय कवीतके यांनी केले आहे.