राजभवनात सकाळी बरोबर ११ वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आल्यानंतर शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली. मात्र, राजभवनाच्या दिशेने येत असताना तानाजी सावंत यांची गाडी वाहतूक कोंडीत अडकली होती. त्यामुळे शपथविधी सुरु होऊन १० मिनिटे उलटल्यानंतर तानाजी सावंत राजभवनाच्या गेटवर पोहोचले. त्यामुळे तानाजी सावंत हे मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठीही उशीरा आले. आणखी काही आमदारांना मुंबईतील ट्रॅफिक जॅमचा फटका बसला. विधानसभेचे अध्यक्ष व कुलाबा मतदारसंघाचे आमदार राहुल नार्वेकर आणि शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील हेदेखील राजभवनात उशीराने पोहोचले.
कोण आहेत तानाजी सावंत?
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे. शिक्षण क्षेत्रासह साखर कारखानदारी क्षेत्रातील तानाजी सावंत हे एक मोठं नाव आहे. ते उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा वाशी या मतदारसंघाचे आमदार आहेत. महाविकास आघाडीत मंत्रिपद न मिळाल्याने तानाजी सावंत हे नाराज होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांनी सातत्याने शिवसेनेवर हल्ला चढवला होता. यामुळे शिवसैनिकांनी पुण्यातील त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. यावरुन प्रचंड तणाव निर्माण झाला होता. तानाजी सावंत हे एक रिसोर्सफुल नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे तानाजी सावंत यांचे मंत्रिमंडळातील स्थान पक्के मानले जाते होते.
शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात कोणाला संधी ?
भाजप : चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, विजयकुमार गावित, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे, मंगलप्रभात लोढा
शिंदे गट : दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, संदीपान भुमरे, संजय राठोड, शंभूराज देसाई, दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार