पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला असला तरी राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडल्याने नदी पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे पंचगंगा नदीचे पाणी धोका पातळीकडे जात असल्याने कोल्हापूर महापुराच्या छायेत आहे. ७५ पेक्षा अधिक बंधारे पाण्याखाली गेली असून जिल्ह्यातील पाच प्रमुख राज्यमार्ग बंद झाल्याने कोकणाशी संपर्क तुटला आहे. (kolhapur on the brink of danger the water of panchganga river increased)
धरणक्षेत्र वगळता जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. पण कोल्हापुरातील पाच तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. यामुळे राधानगरीसह सर्वच धरणे भरली आहेत. राधानगरीचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. यामुळे नद्या दुधडी भरून वाहत आहेत. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडून धोका पातळीच्या दिशेने जात आहे. सध्या ती ४२ फुटावरून वाहत असून आणखी एक फुट पाणी वाढल्यास जिल्ह्यास महापुराचा धोका संभवणार आहे.
कोल्हापूरला असलेल्या संभाव्या पुराच्या धोक्यामुळे प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेची सूचना दिली आहे. अनेक गावात नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे.
अतिवृष्टीमुळे शिवाजी विद्यापीठाने मंगळवार व बुधवारी होणाऱ्या परीक्षा रद्द केल्या आहेत. तर, जिल्ह्यातील ७५ पेक्षा अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे वीस पेक्षा अधिक मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. या बरोबरच गगनबावडा, भुईबावडा मार्गे कोकणात जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीने काल रात्रीच आपली इशारा पातळी गाठली होती. राजाराम बंधाऱ्याच्या पाण्याची पातळी देखील सकाळी ३९ फूट ८ इंचावर गेली होती. पंचगंगा नदीची धोका पातळी ४३ फूट आहे. पंचगंगा सध्या धोका पातळीकडे वाटचाल करत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत ७१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीने आपली इशारा पातळी गाठल्याने यंत्रणाही सतर्क झाले आहे. असाच पाऊस कोसळत राहिला आणि आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.