maharashtra pattern repeats in bihar: महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षांमध्ये जे घडलं, तेच आता बिहारमध्ये घडत आहे. नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडत राष्ट्रीय जनता दलासोबत घरोबा केला आणि विरोधी पक्षात असलेला राजद सत्तेत आला आणि सत्तेत असलेला भाजप विरोधी बाकांवर गेला.

तेजस्वी यांचं पवार स्टाईल राजकारण
अडीच वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. राष्ट्रवादीपेक्षा केवळ २ आमदार अधिक असलेल्या शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळालं. पण त्याबदल्यात राष्ट्रवादीनं अनेक महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली. उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीला मिळाली. अर्थ, गृह मंत्रालयदेखील राष्ट्रवादीनं स्वत:कडे ठेवलं. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्वाखाली राजदनंदेखील पवार स्टाईल राजकारण केलं आहे. उपमुख्यमंत्रीपदासोबतच विधानसभा अध्यक्षदेखील राजदचा असणार आहे.
शिंदे-फडणवीस स्टाईल राजकारण
राज्यातलं ठाकरे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ३० जूनला या दोघांचाच शपथविधी झाला. आज बिहारमध्येही तसाच घटनाक्रम पाहायला मिळाला. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अन्य कोणीही त्यांच्यासोबत शपथ घेतली नाही. शिंदेंसोबत सेनेचे ५० आमदार असताना त्यांना भाजपनं मुख्यमंत्रिपद दिलं आणि स्वत:कडे उपमुख्यमंत्रिपद घेतलं. तर बिहारमध्ये ४३ आमदार असलेल्या नितीश यांना मुख्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. तर ७५ जागा जिंकणाऱ्या राजदनं उपमुख्यमंत्रिपद स्वत:कडे ठेवलं आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.