यावर्षी पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आपल्या भावासाठी म्हणजेच चंद्रकांत पाटील यांच्यासाठी खास देशी बियाणांपासून ‘बीज राखी’ बनवून एक अनोखी व जगावेगळी भेट दिली आहे. भात, नागली, वरई, काकडी, भोपळा यासारख्या अनेक प्रकारच्या गावरान बियांचा वापर करून त्यांनी या राख्या स्वतःच्या हाताने बनवल्या आहेत. चंद्रकांत पाटील यांना बंधू मानलेल्या पद्मश्री राहीबाई यांनी आजपर्यंत बीज बँकेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना आपल्या प्रेमाने व आदराने भाऊ बनवून घेतलं आहे. आपल्या या प्रेमळ भावासाठी त्यांनी बीज राख्यांची विशेष मोहीम राबवली आहे. त्याचप्रमाणे देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या प्रती प्रेम आणि आदर भावना मनामध्ये ठेवून एक धागा राष्ट्रबांधणीचा या विचारांना पुढे नेण्यासाठी त्यांनी या राख्या बनवल्या आहेत. सुरेख दिसणाऱ्या या बीज राख्यांची निर्मिती करून, त्यांनी करत असलेल्या कार्याप्रती आपण किती एकनिष्ठ आणि एकरूप आहोत हे दाखवून दिलं आहे.
दरम्यान, कुठलंही काम निष्ठेने केल्यास तेच काम आपल्याला सर्वोच्च स्थानी नेत असते, हेच वेळोवेळी राहीबाईंच्या उदाहरणातून समोर आलं आहे. राखी पौर्णिमेनिमित्त त्यांनी सर्व देशबांधवांना बीज राखीच्या रूपाने अनोखी भेट व शुभेच्छा दिल्या आहेत. चंद्रकांत पाटील आता पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाले आहेत. त्यांच्या पद्मश्री बहिणीने म्हणजेच राहीबाईंनी पाठविलेल्या अनोख्या भेटीने त्यांचा आनंद आणखी द्विगुणित होईल एवढे मात्र नक्की.