पुणे : राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांआधी भाजपमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. भाजपने प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडून काढून घेत चंद्रशेखर बावनकुळे यांना दिली आहे. तर मुंबईचे अध्यक्ष म्हणून आमदार आशिष यांची नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती केली आहे आणि मुंबईचे अध्यक्ष म्हणून आशिष शेलार यांची नियुक्ती केली आहे. मी त्या दोघांचेही अभिनंदन करतो. आगामी काळात खूप निवडणुका आहेत. त्या निवडणुकांसाठी दोघांनाही चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
आज चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आरती करण्यात आली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. तर योगागोगाने आज मी दगडूशेठ गणपती मंदिरात आहे. त्यामुळे मी गणपती चरणी प्राथर्ना केली आहे की या दोघांना खूप यश मिळू दे. त्यातून आपोआपच भाजप प्रचंड मजबूत होईल. पक्ष आज एक नंबरला आहेच, पण पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये क्रमांक एक आणि क्रमांक दोन यामधील अंतर खूप राहील अशी मला खात्री आहे, असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
राज्यपालांनी पुण्यामध्ये ध्वजारोहण करण्याची परंपरा
स्वातंत्र्यदिनी चंद्रकांत पाटील पुण्यात ध्वजारोहण करणार असल्याचं ठरलं होतं. मात्र ऐनवेळेस ते कोल्हापूरला ध्वजारोहण करणार असल्याचं ठरल्यानंतर चंद्रकांत पाटील यांची घरवापसी होऊन ते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होणार का? या चर्चांना उधाण आले होते. या चर्चांवर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “राज्यपालांनी पुण्यामध्ये ध्वजारोहण करण्याची परंपरा आहे. त्यामुळे दोघे एकाठिकाणी न करता 10 जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार होते. आता त्यातील एक जिल्हा मंत्र्यांनी करावा म्हणून कोल्हापूर ठरलं. यात योग्य अर्थ काढायला शिका” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, पालकमंत्र्यांची घोषणा अजून व्हायची आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याने अधिक अधिक जिल्ह्यांत ध्वजवंदनासाठी मंत्र्यांनी जावं. या प्रयत्नामध्ये राज्यपाल जर पुण्यातील ध्वजवंदन करणार असतील तर मग कोल्हापूरचे झेंडावंदन मी करावं, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचवलं. त्यामुळे मी कोल्हापूरला जात आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.