कुठल्या ना कुठल्या सुप्त ज्वालामुखीचा उद्रेक, त्याचे हादरे, लाव्हारसाचे चटके या सरकारला अधूनमधून बसणारच आहेत. त्यातील पहिला हादरा सरकार समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी दोन दिवसांपूर्वीच दिला. शिवाय ज्या मुद्द्यासाठी आपण शिंदे गटाला समर्थन दिले ते बाजूला पडले तर वेगळा विचार करू, असे गुद्दे बच्चू कडू यांनी सरकारला लगावले. जो उशिरा आला त्याला पहिल्या पंगतीत बसविले आणि जो पहिला गेला त्याचा शेवटच्या रांगेत बसवले आहे, असे कडू यांनी म्हटले. जो जास्त धोका देणार तो मोठा नेता होणार आणि त्यालाच मंत्रिपद मिळणार, अशी खंतही बच्चू कडू यांनी बोलून दाखवले. हाच धागा पकडत शिवसेनेकडून शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे ओढण्यात आले आहेत.
संजय शिरसटांनी ते ट्विट केलं आणि दुसऱ्याच दिवशी शिवसेनेचं भाकीत
शिंदे-फडणवीस सरकारच्या नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात औरंगाबादमधील आमदार संजय शिरसाट यांना स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे संजय शिरसाट प्रचंड नाराज झाले होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी, ‘मी दिलेला शब्द पाळेन’, असे सांगत संजय शिरसाट यांची समजूत काढली होती. त्यावर संजय शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांसमोर सर्वकाही आलबेल असल्याचे म्हटले होते. परंतु, संजय शिरसाट यांनी शुक्रवारी रात्री एक ट्विट करून एकच खळबळ उडवून दिली.
संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करुन उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असं म्हटले. त्यामुळे संजय शिरसाट हे घरवापसीच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु झाली होती. संजय शिरसाट यांनी हे ट्विट डिलीट केले होते. त्यानंतर आता दुसऱ्याच दिवशी ‘सामना’तून शिंदे-फडणवीस सरकारमधील ‘सुप्त ज्वालामुखींचा’ उल्लेख करण्यात आल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.