भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार समारंभ नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी आयोजित समारंभाला नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, तसेच नागपूरचे भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने केलेल्या भाषणात गडकरींनी तुफान फटकेबाजी केली. बावनकुळेंच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकताना त्यांनी कार्यकर्त्यांची शाळा घेतली तर उपस्थित नेत्यांचे त्यांनी कान टोचले.
“देवेंद्र फडणवीसांच्या वडिलांच्या नेतृत्वात मी काम करायचो. त्यांनी कधी नाही म्हटलं की त्याला राजकारणात घ्या. गंगाधरराव फडणवीस आजारी असताना मी त्यांना भेटायला गेलो. त्यांना म्हटलं की तुमची प्रकृती आता बरी नाही. तुमच्या जागी देवेंद्रला संधी द्या. त्यांनी सांगितलं माझी काही हरकत नाही. तुम्ही देवेंद्रशी बोला. मग देवेंद्र राजकारण आले. वडिलांची पुण्याई आणि वारसा होताच. पण त्यांनी नगरसेवक, आमदार, विरोधी पक्षाचा नेता, प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री ही पदं स्वत:च्या कर्तृत्वावर मिळवलं. ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्या पक्षातील आमदार खासदारांनी एक गोष्ट लक्षात पाहिजे की माझ्या मुलाला एक संधी द्या, तिकीट द्या.. असं म्हणता कामा नये… मला नाही तर बायकोला तिकीट द्या.. मेव्हण्याला तिकीट द्या.. असले धंदे बंद.. बावनकुळे साहेब हे सगळं बंद करा… जर कुणी तसं तिकीट मागितलंत तर सर्वांत पहिला माझा विरोध असेन. तुम्ही तुमच्या पोरांसाठी उमेदवारी मागता कामा नये. जनतेचं त्यांच्यावर एवढं प्रेम असावं की त्यांनीच तुमच्या पोरांसाठी उमेदवारी मागायला हवी”, असं गडकरी म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळेंना मुख्यमंत्री होण्याची संधी
“चंद्रशेखर बावनकुळेंना येणाऱ्या काळात पक्षाची सेवा करण्याची संधी आहे. त्यांच्या कर्तृ्त्वावाला वाव मिळणार आहे. आपला पक्ष कार्यकर्त्यांचा आहे, आई मुलाचा पक्ष नाही. एक ऑटो रिक्षा चालवणारा माणूस आपल्या कामाने-कर्तृत्वाने राज्याचा अध्यक्ष झाला हे आपल्या पक्षाचं वैशिष्ट्य आहे. बावनकुळे रात्रंदिवस काम करणारा कार्यकर्ता आहे. आपल्या कामाने वंचित पीडितांना त्यांनी नेहमी न्याय दिला. जनतेचं प्रेम मिळवलं. घरची गरिबी असताना त्यांनी त्या परिस्थितीतही स्वत:चा, कुटुंबाचा विचार न करता पक्षाचं काम केलं. म्हणून देवेंद्र फडणवीस जर दिल्लीत गेले तर चंद्रशेखर बावनकुळेंना मुख्यमंत्री होण्याची संधी आहे”, असं मोठं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.