मुंबई: शिंदे सरकारचं खातेवाटप जाहीर झालं आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दीड महिन्यांनी राज्याला मंत्रिमंडळ मिळालं आहे. या खातेवाटपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वरचष्मा पाहायला मिळत आहे. अनेक महत्त्वाची खाती फडणवीसांनी आपल्याकडे ठेवली आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीकडे असलेली जवळपास सर्व महत्त्वाची खाती आता भाजपनं घेतली आहेत. तर दुय्यम दर्जाची खाती शिंदे गटाला देण्यात आली आहेत.

राज्यात ठाकरे सरकार असताना राष्ट्रवादीनं अनेक वजनदार खाती स्वत:कडे ठेवली होती. त्यामुळे मुख्यमंत्री शिवसेनेचा, मात्र महत्त्वाची खाती राष्ट्रवादीला, त्यामुळे सरकारवर वरचष्मा राष्ट्रवादीचा असं चित्र होतं. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह ४० आमदारांनी बंड केलं. राष्ट्रवादीकडे असलेली मंत्रिपदं आणि त्यांना मिळत असलेला निधी हे त्या बंडामागचं प्रमुख कारण होतं. आता त्याच राजकारणाची पुनरावृत्ती होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
चंद्रकांत पाटलांना धक्का; महत्त्वाची खाती फडणवीसांकडे, शिंदे गटाच्या अनेकांना प्रमोशन
मविआ सरकारमध्ये अजित पवारांकडे अर्थ, दिलीप वळसे पाटलांकडे गृह आणि जयंत पाटलांकडे जलसंपदा मंत्रालय होतं. ही सगळी महत्त्वाची खाती शिंदे सरकारमध्ये एकट्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असतील. शिंदे गटातील अनेक जण निधी मिळत नसल्यानं नाराज होते. त्यावेळी अजित पवारांकडे असलेलं खातं आता फडणवीसांकडे असेल. २०१४ ते २०१९ या कालावधीत फडणवीस मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी गृह मंत्रालय स्वत:कडे ठेवलं होतं. आताही त्यांनी हे मंत्रालय स्वत:कडे ठेवलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास तर फडणवीसांकडे अर्थ आणि गृह, खातेवाटपात भाजपच मोठा भाऊ
काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांना महसूल खातं देण्यात आलं आहे. चंद्रकांत पाटलांना उच्च आणि तंत्रशिक्षण, गिरीश महाजनांना ग्राम विकास, वैद्यकीय शिक्षण अशी खाती देण्यात आली आहेत. त्या तुलनेत शिंदे गटाला दुय्यम मंत्रालयं देण्यात आली आहेत. शिंदे गटाचा मुख्यमंत्री आहे. मात्र महत्त्वाची खाती त्यांच्याकडे नाहीत. त्यामुळे फडणवीस यांनी पवार पॅटर्न रिपीट केल्याची चर्चा आहे. शरद पवारांनी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देत महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे घेतली होती. त्याच पॅटर्नची पुनरावृत्ती फडणवीसांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here