Politician Who Died In Accidents: शिवसंग्रामचे संस्थापक विनायक मेटे यांचं १४ ऑगस्ट रोजी रविवारी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघाती निधन (Vinayak Mete car Crash On Mumbai-Pune Expressway) झालं. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर आतापर्यंत सामान्यांसह राजकीय नेते, अभिनेत्यांचाही मृत्यू झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे मृत्यूचा सापळाच ठरतो आहे. मेटेंच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांसह कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे. मेटेंच्या कारला रविवारी पहाटे एका ट्रकने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती, की मेटेंच्या कारचा या एका बाजूने चक्काचूर झाला. या अपघातात मेटेंचा जागीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मेटेंआधी काही नेत्यांचं अशाप्रकारे अपघाती निधन झालं आहे. रस्ते अपघातासह काही नेत्यांचा हेलिकॉप्टर अपघातातही मृत्यू झाला आहे. यात गोपीनाथ मुंडे, संजय गांधींसह इतरही नेत्यांचा समावेश आहे.

गोपीनाथ मुंडे

३ जून २०१४ रोजी पहाटे मुंडे (Gopinath Munde) यांच्या गाडीला अपघात झाला होता. मुंडे सकाळी ६च्या सुमारास त्यांच्या कारमधून ड्रायव्हर आणि त्यांच्या सचिवासह दिल्लीला निघाले होते. त्यावेळी त्यांच्या सुझुकी एसएक्स ४ या कारला दुसऱ्या वाहनाने धडक दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानापासून एक किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. नंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपघातानंतर मुंडे यांचा श्वास बंद झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. अपघातानंतर हृदयविकाराच्या झटक्याने मुंडे यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. यावेळी मुंडे यांचे ड्रायव्हर आणि सेक्रेटरी दोघेही सुखरुप होते.

राजशेखर रेड्डी

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी (Y. S. Rajasekhara Reddy) यांचा सप्टेंबर २०१९ मध्ये अपघाती मृत्यू झाला होता. आंध्र प्रदेशातील रुद्रकोंडा हिल्स इथे हेलिकॉप्टर अपघातात त्यांचं निधन झालं. जवळपास २४ तास त्यांचं हेलिकॉप्टर बेपत्ता होतं. हेलिकॉप्टर शोधण्यासाठी मोठी बचाव मोहिम हाती घेण्यात आली होती. रेड्डी यांनी दोन वेळा आंध्र प्रदेशचं मुख्यमंत्री पद भूषवलं होतं. या अपघाताची चौकशीही करण्यात आली होती. हेलिकॉप्टरने टेक-ऑफ करताना हवा योग्य नव्हती, अशात वैमानिकांनी चुकीचा निर्णय घेतल्याचं समोर आलं होतं. हेही वाचा – मेटेंच्या कारसारखीच कार कोल्हापुरात ४०० फूट दरीत कोसळली होती; तेव्हा चमत्कार घडला होता

साहिब सिंग वर्मा – राजेश पायलट

दिल्लीचे मुख्यमंत्री, वाजपेयी सरकारमधील केंद्रीय कामगार मंत्री, जेष्ठ भाजप नेते साहिब सिंग वर्मा (Sahib Singh Verma) यांचं अपघाती निधन झालं होतं. जून २००७ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. वर्मा हे १९९६ ते १९९८ या दोन वर्षात दिल्लीचे मुख्यमंत्री होते. त्यांची कार जयपूर हायवेवर एका ट्रकला धडकून अपघात झाला होता. तसंच माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश पायलट (Rajesh Pilot) यांचं जून २००० मध्ये निधन झालं होतं. राजस्थानात रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता.

माधवराव सिंधिया – जीएमसी बालयोगी

ज्येष्ठ काँग्रेस नेते माधवराव सिंधिया (Madhavrao Scindia) यांचंही अपघातात निधन झालं होतं. त्यांच्यासह इतर ६ जणांचा यावेळी मृत्यू झाला होता. त्याचं खासगी विमान क्रॅश होऊन २००१ मध्ये हा अपघात झाला होता. वयाच्या ५६व्या वर्षी सिंधिया यांचं निधन झालं. मणिपूर जिल्ह्याजवळ विमानाला हा अपघात झाला. त्याशिवाय ३ मार्च २००२ रोजी लोकसभा स्पीकर तेलुगू देशम पार्टीचे लीडर जीएमसी बालयोगी (G. M. C. Balayogi) यांचंही आंध्रप्रदेशात हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये निधन झालं होतं.

संजय गांधी

२३ जून १९८० ला भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी (Sanjay Gandhi) यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला होता. नवी दिल्लीतील सफदरजंग विमानतळाजवळ त्यांचा मृत्यू झाला होता. संजय गांधी यांच्याकडे व्यावसायिक पायलट, छोटं विमान उडवण्याचा परवाना आणि प्रशिक्षकाचं रेटिंग असं दोन्ही होतं. ज्यावेळी अपघात झाला, त्यावेळी ते स्वत:चं खासगी विमान स्वत:च उडवत होते. नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जातं.

श्रीकांत जिचकार

२ जून २००४ रोजी श्रीकांत जिचकार (Shrikant Jichkar Nagpur) यांचं निधन झालं. नागपूरपासून जवळपास ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या कोंढाळीजवळ त्यांच्या कारला अपघात (Car Accident) झाला. ट्रकने त्यांच्या कारला धडक दिल्याने हा अपघात झाला होता. यातच त्यांचा मृत्यू झाला. जिचकार यांनी २० पदव्या मिळवल्या होत्या. देशातले सर्वात तरुण आमदार म्हणून त्यांची ओळख होती. वयाच्या २६व्या वर्षी ते आमदार म्हणून निवडून आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here