सोलापूर: पारशी (झोरोस्ट्रीयन) समाज पतेती हा दिवस क्षमा, पश्चाताप म्हणून साजरा करतात. दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी पतेती सण पारशी समाजाकडून अग्नी देवते समोर माफी मागून साजरा केला जातो. आणि दुसऱ्या दिवशी १६ ऑगस्ट रोजी नववर्ष साजरा केला जातो. याला नवरोझ असेही म्हटले जाते. पतेतीला पश्चाताप करत आपल्या सर्व पापांबद्दल अग्नीदेवते समोर माफी मागितली जाते. पतेतीला पारशी समाजातील लोकं त्यांच्या चुका, वाईट गोष्टींबाबत क्षमा मागतात आणि दुसऱ्या दिवसापासून नवी सुरुवात करतात. सोलापुरात देखील जेमतेम लोकसंख्या असलेल्या पारशी समुदायातील लोक पतेती व नवरोज साजरा करत आहे. सोलापुरात पारशी समुदायाची लोकसंख्या बोटावर मोजण्या इतकी राहिली आहे. आजदेखील पारशी समुदायातील लोकसंख्या घटतच चालली आहे. (Parsi New Year 2022)

पारशी लोकसंख्या वाढविण्यासाठी जियो पारशी योजना- भारत देशातील पारशी लोकसंख्या घटत असल्यामुळे केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१३ साली जियो पारशी योजना आणली. पारशी सामुदायात जास्तीतजास्त मूल बाळ जन्माला यावे यासाठी ही योजना आहे. या योजनेनुसार २०१३ पासून आजतागायत पारशी समाजात फक्त ३५९ बाळांचा जन्म झाला आहे. २०१४ मध्ये १६ बाळ जन्माला आले, २०१५ साली ३८ बाळं जन्माला आली. २०१६ मध्ये २८ बाळं जन्माला आले. २०१८ मध्ये ३८ , २०१९ मध्ये ५९ आणि २०२० मध्ये ६१ बाळं जन्माला आली.

सोलापुरात शंभरहून कमी पारशी नागरीक

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात शंभरहून कमी पारशी नागरिक राहत असल्याची माहिती पुजारी विष्टाष्प मुंशी यांनी दिली. सोलापूर शहरातील लष्कर या भागात पारशी सामुदायाचे अग्यार(मंदिर) आहे. हे मंदिर १८४४ मध्ये ब्रिटिश काळी स्थापन झाले आहे. पारशी अंजुमन या संस्थेमार्फत या मंदिराची देखभाल केली जाते. शहरात शंभरहून कमी लोकसंख्या असल्याची माहिती यावेळी दिली. झरीन अमरिया, झुबिन अमरिया, फरीज दारुखनावला, बेहराम इरानी, मोनाज पेठावाला, अनहिता लाल हे अग्यारी मंदिराचं सांभाळ करत आहेत.सोलापुरातील अग्यारी मंदिराचे पूजारी त्यांचे वय जवळपास १२० वर्ष आहे, ते देखील अद्याप अविवाहित आहेत. त्यांचे बंधू १५० वय असताना निधन झाले ते देखील अविवाहित होते. पारशी समाजात मुलीच नसल्याने लग्न करणे अवघड झाले आहे असेही यावेळी विष्टाष्प मुंशी म्हणाले.

कित्येक दशकांपासून लोकसंख्या घटत आहे

देशात १९४१ सालापासून पारशी समुदायाची लोकसंख्या घटत चालली आहे. यामध्ये प्रमुख कारण म्हणजे अविवाहित राहणे, उशीरा लग्न करणे, समुदायाच्या बाहेरिल मुलीसोबत लग्न न करणे, अशा अनेक कारणांमुळे १९४१ पासून पारशी समुदाय कमी होत चालला आहे. २००१ च्या जनगणनेनुसार भारतात पारशी लोकसंख्या ६९ हजार ६०१ होती. २०११ च्या लोकसंख्येनुसार ५७ हजार २६४ इतके पारशी लोक उरले आहेत. सोलापूर शहरात बोटावर मोजण्या इतके पारशी लोक राहत आहेत.भारतातील फक्त मुंबई येथे पारशी लोकसंख्या जास्त प्रमाणात पहावयास मिळते.

१८४४ साली अग्यारी मंदिरात पेटवलेली आग आजही पेटलेली

सोलापूर शहरात ब्रिटिश शासन होते.त्यावेळी पारशी समाजाने लष्कर परिसरात अग्नी देवतेचे अग्यारी मंदिर स्थापन केले.त्याकाळी या मंदिरात मुख्य गाभाऱ्यात अग्नी पेटवले होते.आजतागायत ती आग किंवा अग्नी विझली नाही. याला नेहमी पेटत ठेवले जात असल्याची माहिती अग्यारी मंदिराच्या पुजाऱ्याने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here