मुंबई: माजी आमदार आणि शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूबाबत अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. अपघाताची वेळ, मेटे यांना वैद्यकीय मदत मिळण्यात झालेला उशीर, ड्रायव्हरची संशयास्पद भूमिका या सगळ्या कारणांमुळे हे प्रकरण दिवसेंदिवस किचकट होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर आता विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या पत्नी ज्योती मेटे (Jyoti Mete) यांच्या वक्तव्यामुळे या प्रकरणातील गूढ आणखीनच वाढले आहे. विनायक मेटे यांना अपघातानंतर रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्यांचा चेहरा पांढराफटक पडला होता. ही गोष्ट खूप विचित्र असल्याचे ज्योती मेटे यांनी म्हटले. (Vinayak Mete motor accident on mumbai pune expressway)
मराठा समाजासाठी लढणाऱ्या नेत्यांचे सुवर्णकाळ सुरु होण्याच्यावेळीच अपघात कसे घडतात: दीपाली सय्यद
ज्योती मेटे यांचा मुख्य आक्षेप विनायक मेटे यांच्या मृत्यूच्या वेळेबद्दल आहे. आम्हाला कळवण्यात आलेली अपघाताची वेळ आणि प्रत्यक्ष अपघाताची वेळ यामधील टाईम गॅपची चौकशी व्हावी, असे त्यांनी म्हटले आहे. अपघात झाल्याचे कळताच मी पाऊण तासात मुंबईतून कामोठे रुग्णालयात पोहोचले. मी स्वत: डॉक्टर आहे. वैद्यकीय निकषांप्रमाणे, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा चेहरा लगेच पांढारफटक पडत नाही. विनायक मेटे यांना कामोठे रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्यांच्या कानातून आणि नाकातून रक्त वाहत होते. तेव्हाच मी माझ्या भावाला म्हणाले की, ही घटना पाऊण तासापूर्वी घडलेली नाही. हा अपघात होऊन किमान दोन तास झाले असतील. तेव्हा आमच्यापासून काहीतरी लपवले जात आहे, असे वाटत होते. कदाचित तसे नसेल. आता शवविच्छेदन अहवालात मृत्यूची नेमकी वेळ कळेलच, असे ज्योती मेटे यांनी म्हटले.

मला साहेबांच्या अंत्यसंस्काराला जाऊ द्या, त्यांचं दर्शन घेऊ द्या, मेटेंच्या ड्रायव्हरने टाहो फोडला
दीपाली सय्यद यांच्याकडून घातपाताचा संशय व्यक्त

विनायक मेटे यांचा अपघात नव्हे तर घातपात होता, असे आरोप सातत्याने सुरु आहेत. पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये दीपाली सय्यद यांनीही विनायक मेटे यांच्या अपघाताबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, समाजासाठी लढणारे नेत्यांचे सुवर्णकाळ सुरू होण्याच्या वेळीच कसे अपघात होतात, आणि नेहमी चालकच कसे जखमी होत नाहीत, कदाचित यांचा मास्टर माईंड एकच असु शकतो, शोध अपुर्ण नसावा, शहानिशा झालीच पाहीजे. महाराष्ट्राचे खूप मोठे नुकसान होत आहे अश्या घातपाताने, असे दीपाली सय्यद यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here