अमरावती : नागपूरवरून बुलढाणा जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सच्या चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रॅव्हल्स पलटी होऊन दोन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना महामार्गावरील नांदगांव पेठ नजीक हॉटेल वाटिकाजवळ मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली. ट्रॅव्हल्समधील अन्य १४ प्रवासी सुखरूप असल्याची माहिती नांदगांव पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास नागपूर येथून बुलढाणा करिता प्रवासी घेऊन एम एच २८ बीबी ३१३२ क्रमांकाची ‘गगन’ नावाची ट्रॅव्हल्स भरधावपणाने अमरावतीकडे येत असताना एक वाजेच्या दरम्यान हॉटेल वाटिका नजीक चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने ट्रॅव्हल्स दुभाजकावर कोसळली. यामध्ये राहुल विनय गुप्ता (वय ५० रा सार्भा नगर, लुधियाना पंजाब) आणि अरुण प्रल्हाद सावळे (वय ५५, रा नंदनवन नागपूर) हे दोघेही जागीच ठार झाले तर सीमा शुद्धोधन पाटील (वय ३५ रा. सक्करदरा, नागपूर) आणि अमित सुरेश बेरोजाय (वय ३४ रा लकडगंज, भुसावळ चौक, खामगाव) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

उद्धव ठाकरेंनी दंड थोपटले, पोहरादेवीच्या दर्शनाला जाणार, बंजारा समाजाच्या महंतांचीही भेट
अपघात घडताच काही वेळ महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीण काळे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने रुग्णवाहिकेचं पाचारण करून जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. अन्य १४ प्रवासी आपापली व्यवस्था करून सुखरूप निघून गेले. सरदार सुरेंद्र सिंग कुलावंत सिंग रा कर्नाल हरियाणा यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अपघातास कारणीभूत असलेल्या चालकावर कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक काळे करीत आहे.

एसटीची रिक्षाला धडक, चालकाचा ताबा सुटला; बस धरणाच्या पाण्यात जाणार तितक्यात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here