मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास नागपूर येथून बुलढाणा करिता प्रवासी घेऊन एम एच २८ बीबी ३१३२ क्रमांकाची ‘गगन’ नावाची ट्रॅव्हल्स भरधावपणाने अमरावतीकडे येत असताना एक वाजेच्या दरम्यान हॉटेल वाटिका नजीक चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने ट्रॅव्हल्स दुभाजकावर कोसळली. यामध्ये राहुल विनय गुप्ता (वय ५० रा सार्भा नगर, लुधियाना पंजाब) आणि अरुण प्रल्हाद सावळे (वय ५५, रा नंदनवन नागपूर) हे दोघेही जागीच ठार झाले तर सीमा शुद्धोधन पाटील (वय ३५ रा. सक्करदरा, नागपूर) आणि अमित सुरेश बेरोजाय (वय ३४ रा लकडगंज, भुसावळ चौक, खामगाव) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात घडताच काही वेळ महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीण काळे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने रुग्णवाहिकेचं पाचारण करून जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. अन्य १४ प्रवासी आपापली व्यवस्था करून सुखरूप निघून गेले. सरदार सुरेंद्र सिंग कुलावंत सिंग रा कर्नाल हरियाणा यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अपघातास कारणीभूत असलेल्या चालकावर कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक काळे करीत आहे.