भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी आघाडी सरकारच्या काळातील सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणात विरोधी पक्षनेते अजित पवार हे अडचणीत येणार असल्याची चर्चा सुरु झाले. आघाडी सरकारमध्ये अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते. यावेळी सिंचन प्रकल्पांची कामे देताना हजारो कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप अजित पवार यांच्यावर झाले होते. मात्र, २०१९ मध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे ८० तासांचे सरकार स्थापन झाले होते तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सिंचन घोटाळ्याची केस बंद केली होती. मात्र, मोहित कंबोज यांच्या ट्विटनंतर आता ही केस पुन्हा ओपन होण्याची दाट शक्यता आहे.
“मी सरकारचा भाग नाही, सत्तापक्षाचा सदस्य आहे. मी अजितदादांच्या त्या केसविषयी आणि कारवाईच्या संकेताविषयी बोलणार नाही. सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर सरकार माहिती देईल. पण मोहित कंबोज यांचा स्ट्राईक रेट १०० टक्के आहे, हे खरंय.. त्यांच्याकडे पुरावे असतील… ते नक्की पुरावे सादर करतील… एखाद्याकडे माहिती असेल तर तो ट्विट करु शकतो, दावे करु शकतो, लोकशाहीत तसा प्रत्येकाला अधिकार आहे”, असं सांगत मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी कंबोज यांची पाठराखण केली.
प्रवीण दरेकर यांनी बुधवारी यासंदर्भात एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी प्रवीण दरेकर यांना मोहित कंबोज यांच्या ट्विटविषयी विचारणा झाली. त्यावर दरेकर यांनी म्हटले की, एखाद्या नागरिकाने ट्विट केलं तर एवढं गदारोळ करण्याचे कारण नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेतेही सोशल मीडियावर आमच्यावर विखारी आणि कुत्सित टीका करतात. तेव्हा आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपतो आणि काही बोलत नाही. त्यामुळे आता मोहित कंबोज यांचं ट्विटही कोणाला झोंबण्याच कारण नाही. आपण निष्कलंक असू, आपला दोष नसेल तर अशाप्रकारचं ट्विट गंभीरपणे घेण्याचे कारण नाही. लोकशाही प्रत्येकाला चौकशीची मागणी करण्याचा अधिकार आहे, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले.
त्यावर सिंचन घोटाळ्याचा तपास पुन्हा सुरु करणार का, असा प्रश्न दरेकर यांना विचारण्यात आला. तेव्हा दरेकर यांनी म्हटले की, गेल्या सरकारच्या काळातही सी समरी झालेल्या, बंद करण्यात आलेल्या केस पुन्हा ओपन करून तपास करण्यात आला. त्यामुळे सिंचन घोटाळ्याच्या चौकशीही मागणी होईल. एखादा विषय प्रसारमाध्यमांतून चव्हाट्यावर आला, कोणी शंका उपस्थित केली असेल तर त्याला न्याय देणे, संबंधित विषय धसास लावणे, ही एक लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे. त्याच जबाबदारीच्या भावनेतून आम्ही सिंचन घोटाळ्याच्या विषयाला हात घालू. सिंचन घोटाळ्याची चौकशी हो कोणा एका व्यक्तीविरोधात नाही. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेण्याची गरज आहे, असे दरेकर यांनी म्हटले. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकार सिंचन घोटाळ्याची नव्याने चौकशी करण्याचे आदेश देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच गिरीश महाजन यांनीही याच अनुषंगाने वक्तव्य केलं.
एकंदरितच मोहित कंबोज यांच्या ट्विटचा अर्थ आणि भाजप नेत्यांनी कंबोज यांची केलेली पाठराखण यावरुन अजितदादांची कथित सिंचन घोटाळ्याची ती फाईल पुन्हा रिओपन होणार, याचेच संकेत आहेत.