राज्यात सुरू असलेल्या राजकीय सत्तानाट्य आणि घडामोडीमुळे यंदा कोल्हापुरात प्रथमच राजकीय दहीडंहीची इर्ष्या पहायला मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) युवाशक्तीच्या दहीहंडीला स्पर्धा म्हणून यंदा शिवसेनेच्या (Shiv Sena) वतीने ही स्पर्धा प्रथमच भरविण्यात आली आहे, त्यानंतर शिवसेनेला टक्कर म्हणून बंडखोर शिंदे गटानेही (Shinde Group) लाखाची स्पर्धा जाहीर केली. यामुळे यंदा पारंपारिक दहीहंडी ऐवजी राजकीय इर्ष्या पहायला मिळणार आहे. (jealousy of political dahi handi is in discussion in kolhapur)
गेल्या अनेक वर्षापासून कोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी अशी जाहिरात बाजी करत धनंजय महाडिक युवाशक्ती दहीहंडीची स्पर्धा भरवते. यंदा तीन लाखाचे पहिले बक्षीस आहे. राज्यात भाजपची सत्ता येताच कोल्हापूर जिल्ह्यातील महाडिक गटाला मोठी ताकद मिळाली आहे. गेल्या पाच सहा वर्षापासून सतत पराभव होत असल्याच्या पार्श्वभूमीवर धनंजय महाडिक यांना मिळालेली खासदारकी आणि राज्यात आलेली सत्ता यामुळे यंदाची युवाशक्तीची दहीहंडी जोरदार होणार आहे. शुक्रवार दि. १९ ऑगस्ट रोजी दसरा चौकात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी अशी ही दहीहंडी रंगणार आहे.
महापूर आणि कोरोना संसर्गामुळे गेली ३ वर्षे युवाशक्ती दहीहंडीचे आयोजन झाले नव्हते. आता मात्र कोव्हीड संसर्ग ओसरला आहे. दुसरीकडे राज्य शासनाने सर्व सण आणि उत्सवावरील निर्बंध हटवले आहेत. शिवाय लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद, गोकुळ अशा ठिकाणी सतत पराभव होत असल्याने महाडिक गट थोडा नाराज होता. यंदा मात्र धनंजय महाडिक राज्यसभेवर निवडून आले. राज्यात नुकतीच भाजपची सत्ता आली. यामुळे हा गट सध्या उत्साही आहे. हा उत्साह आता दहीहंडीच्या निमित्ताने दिसणार आहे.
स्पर्धेच्या उद्घाटनाला उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, सुरेश हाळवणकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिह घाटगे यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. युवाशक्तीच्या वतीने खासदार महाडिक यांनी याबाबत घोषणा करताच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने यंदा प्रथमच दहीहंडी घेण्याची घोषणा केली. जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे,शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी यांनी यामध्ये पुढाकार घेतला. त्यासाठी त्यांनी मोक्याची बिंदू चौकाची जागा निवडली.
शिवसेनेने दहीहंडीची घोषणा केल्यानंतर मग बंडखोर सेना तर यामध्ये मागे कशी राहील. अपेक्षेनुसार बंडखोर शिवसेनेचे नेते व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीही लाखाची दहीहंडी स्पर्धा घोषित करत शिवसेनेला आव्हान दिले. त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी चौकाची जागा निवडली. म्हणजे दसरा चौक, बिंदू आणि शिवाजी चौकात यंदा तीन पक्षाची राजकीय इर्ष्या पहायला मिळणार हे नक्की आहे. कारण येथे उद्घाटनाच्या निमित्ताने एकमेकांवर टोलेबाजी होणार असल्याने धार्मिक कार्यक्रमात राजकीय टोले ऐकायला मिळणार आहेत. कोल्हापुरात यापूर्वी किरकोळ गल्ली बोळात असे दहीहंडीची स्पर्धा होत होती, यंदा मात्र राजकीय उलथापालथीमुळे मोक्याच्या चौकात इर्ष्या रंगणार आहे.