अधिवेशाच्या पहिल्या दिवशी अभिनंदनपर प्रस्ताव आणि शोकप्रस्ताव आवरल्यानंतर कामकाज विधिमंडळाचं दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधिमंडळात सत्ताधारी विरोधकांमध्ये फारशी खडाजंगी झाली नसली तरी विधिमंडळाच्या बाहेर त्यांच्यामध्ये जोरदार सामना रंगलेला पाहायला मिळाला. आज दुसऱ्या दिवशी सभागृह आणि सभागृहाबाहेरही सत्ताधारी विरोधकांमध्ये ‘द्वंद्व’ पाहायला मिळण्याची शक्यता असताना, पहिल्या अर्ध्या तासांतच विरोधकांनी आपले इरादे स्पष्ट केलं. शिंदे गटाच्या आमदारांच्या आगमनाच्या वेळीच मविआ आमदारांनी एकजुटीने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जमत घोषणाबाजीला सुरुवात केली.
आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालं. त्यानंतर थोड्या वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधिमंडळात पोहोचले. मग सत्ताधारी पक्षाचे आमदार विधिमंडळात दाखल होऊ लागले. त्यावेळी गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो चले गुवाहाटी, अशी नवी घोषणा देऊन विरोधी पक्षाच्या आमदारांनी शिंदे गटाच्या आमदारांना हिणवलं. अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे देखील घोषणाबाजीत सामील झाले होते. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी मोठ्या आवाजात ही घोषणा दिल्या. त्यांच्या घोषणेनंतर इतर विरोधी पक्षाच्या आमदारांनी देखील शिंदे यांच्या सुरात सूर मिसळला आणि विधिमंडळ परिसर दणाणून सोडला.
राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या सलग दुसर्या दिवशी विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत विरोधकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.