IPS Rashmi Shukla | आरोप झाल्यानंतर रश्मी शुक्ला केंद्रीय प्रतिनियुक्तीवर सीआरपीएफमध्ये निघून गेल्या. परंतु, महाविकास आघाडी सरकारने फोन टॅपिंग प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी हे प्रकरण मुंबई सायबर सेलकडे सोपवले होते. या सगळ्या चौकशीला रश्मी शुक्ला यांनी अपेक्षित सहकार्य केले नव्हते. त्या चौकशीसाठी मुंबई यायला तयार नव्हत्या. मी पत्रव्यवहाराद्वारे उत्तरे देईन, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

हायलाइट्स:
- फोन टॅपिंग प्रकरणाची सध्या न्यायालयीन सुनावणी सुरु आहे
- एक दिवस आधीच रश्मी शुक्ला या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
- रश्मी शुक्ला केंद्रीय प्रतिनियुक्तीवर सीआरपीएफमध्ये निघून गेल्या
२०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राने ऐतिहासिक असे राजकीय नाट्य अनुभवले होते. शिवसेनेने भाजपला धक्का देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकास आघाडीची स्थापना केली होती. हे सर्व राजकीय नाट्य तब्बल ३६ दिवस सुरु होते. या काळात महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी त्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप आहे. गुप्तवार्ता विभागाने रश्मी शुक्ला यांच्या सांगण्यावरून टॅप केले होते. ज्या नेत्यांचे फोन टॅप करायचे आहेत, त्यांची बनावट नावं सांगून, हा सगळा उद्योग करण्यात आला होता. त्यामुळे रश्मी शुक्ला अडचणीत आल्या होत्या. आरोप झाल्यानंतर रश्मी शुक्ला केंद्रीय प्रतिनियुक्तीवर सीआरपीएफमध्ये निघून गेल्या. परंतु, महाविकास आघाडी सरकारने फोन टॅपिंग प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी हे प्रकरण मुंबई सायबर सेलकडे सोपवले होते. या सगळ्या चौकशीला रश्मी शुक्ला यांनी अपेक्षित सहकार्य केले नव्हते. त्या चौकशीसाठी मुंबई यायला तयार नव्हत्या. मी पत्रव्यवहाराद्वारे उत्तरे देईन, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. यानंतर सायबर पोलिसांचे पथक हैदराबादलाही गेले होते. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रश्मी शुक्ला यांना अटक होणार असल्याची चर्चा होती.
मात्र, आता राज्यात सत्तापालट झाल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्यावरील फोन टॅपिंगचे गंडांतर दूर होईल, अशी चर्चा सुरु झाली आहे. एवढेच नव्हे तर केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्रात ‘घरवापसी’ होईल, अशी कुजबुजही सुरु झाली आहे. त्यामुळे आता याप्रकरणात रश्मी शुक्ला यांना क्लिनचिट मिळून त्या उजळ माथ्याने महाराष्ट्रात परतणार का, हे पाहावे लागेल.
रश्मी शुक्लांबाबत बच्चू कडुंची प्रतिक्रिया
रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याविषयी अपक्ष आमदार बच्चू कडू यांना विचारणा करण्यात आली. यावर बच्चू कडू यांनी म्हटले की, माझा फोन टॅप झाल्याचे उघड झाले होते. ही गोष्ट मला चुकीची वाटते. गांजा तस्करीचे कारण पुढे करून माझा फोन टॅप झाल्याचे निष्पन्न झाले होते. असे घडत असेल तर ही गोष्ट लोकशाहीसाठी घातक आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network