मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आक्रमक भूमिकेत पाहायला मिळाले. अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. तसंच आपल्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करणाणाऱ्या मंत्री शंभूराज देसाई यांनाही त्यांनी चांगलंच फटकारल्याचं पाहायला मिळालं.

‘आपण कॅबिनेटमध्ये एकत्र घेतलेल्या निर्णयांनाच तुम्ही स्थगिती दिली आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांना ५०-५० कोटींचा निधी दिला, पण आमच्यासोबत भेदभाव केला जात आहे. शिंदे साहेब हे वागणं बरं नाही. सगळे दिवस सारखे नसतात, कधी आपल्याला एकत्र यावं लागेल याचा भरोसा नाही,’ असा टोला अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.

मी मंत्र्याशी बोलतो, तुमच्याशी नाही; भाषणात अडथळा आणणाऱ्या नितेश राणेंना भास्कर जाधवांचा इंगा

अजित पवारांनी शंभूराजेंना सुनावलं

अजित पवार हे आपल्या कडक आणि रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांच्या याच स्वभावाची आज सभागृहातही प्रचिती आली. ते ओल्या दुष्काळाबाबत बोलत असतानाच मंत्री शंभूराज देसाई हे काहीतरी बोलले. त्यानंतर अजित पवार यांचा पारा चढला. ‘ २००३ ला तत्कालीन आघाडी सरकारने कसा कृत्रिम पावसाचा प्रयोग केला त्याबाबत अजित पवार सांगत होते. यावर शंभूराज देसाई पाऊस चांगला झालाय असं म्हणाले. मात्र सगळीकडे ओला दुष्काळ पडलाय आणि पाऊस जास्त झाला काय म्हणता? आपण एकत्र काम केलं आहे. मध्ये बोलायचं नाही,’ असं म्हणत अजित पवारांनी शंभूराज देसाईंना सुनावलं.

देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला वॉशिंग मशीनचं काम करत असेल: बाळासाहेब थोरात

दरम्यान, ‘एकीकडे माणसं मरत आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्याचा दौरा सुरू असून क्रेनने हार घातले जात आहेत. असे सत्कार न करता शांतपणे घ्या अशी सूचना देणं अपेक्षित होतं. शेतकरी संकटात असताना त्याच्या मागे उभा राहणं गरजेचं होतं. यातूनच शेतकऱ्यांना बळ मिळतं. २००३ च्या दुष्काळात आपल्याकडे पाऊस पडत नव्हता, तेव्हा कृत्रिम पावसाचाही प्रयत्न आम्ही केला. तुमचे लोक क्रेनने हार घालून घेतात, अजून शेतकरी अडचणीत आहे, हे वागणं बरं नाही,’ अशा शब्दांत अजित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here