Maharashtra Tadoba News: महाराष्ट्रातील ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पात असणारी गावं बिबटे आणि वाघांच्या हल्ल्यांना बळी पडत आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत अनेक शेतकरी, मेंढपाळ जखमी झाले असून आजपर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बिबट्या आणि वाघांच्या हल्ल्यापासून मेंढपाळ आणि शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी आता नवी युक्ती शोधण्यात आली आहे. येथील शेतकरी आणि मेंढपाळांना वाघांच्या, बिबट्यांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी उलटे मास्क लावण्याची नवी युक्ती वापरली जात आहे. वाघ, बिबटे मागून हल्ला करतात. त्यामुळे मानवी चेहऱ्याचे मुखवटे व्यक्तीने चेहऱ्याच्या मागे लावल्यास वाघ, बिबटे यामुळे फसू शकतात. त्यांना माणूस आपल्याकडेच पाहत असल्याचं वाटेल आणि हल्ल्यापासून बचाव होऊ शकेल. ही मोहीम देशातील सर्वात जुनी वन्यजीव संस्था, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (BHNS) सुरू केली आहे. या संस्थेकडून आता मानवी फेस मास्कचं वितरण केलं जात आहे.

वाघ, बिबट्याचे हल्ले

करोना काळात पर्यटनावर बंदी होती. पर्यटनासाठी असलेलं ताडोबा अभयारण्यही बंद होतं. यावर्षी मे-जूनमध्ये हे अभयारण्य सुरू करण्यात आलं. अभयारण्य सुरू झाल्यानंतर मे-जूनच्या दरम्यान येथील वाघ, बिबट्यांनी चार जणांवर हल्ला केला. तसंच तीन शेतकऱ्यांवरही हल्ले झाले. येथील गावात वाघ आणि मानवाचा हा संघर्ष मोठा आहे. २०२१ मध्ये महाराष्ट्रात ८१ लोकांच्या मृत्यूपैकी एकट्या चंद्रपूरमधून ४४ जणांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. २०२१ मध्ये ४७ मृत्यूंपैकी २४ मृत्यू जिल्ह्यात झाले. यातील बहुतांश हल्ले वाघ आणि बिबट्यांनी केले आहेत.

वाघ, बिबट्या हल्ल्यात अनेक मृत्यू

मेंढपाल आणि शेतकऱ्यांना घराबाहेर पडणं, जंगलात जाणं भाग आहे. याच काळात वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात अनेक जण बळी पडले आहेत. हे सर्व हल्ले मे आणि जूनमध्ये सुरू झाले. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी अर्थात BHNS चे सहाय्यक संचालक संजय करकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, BHNS च्या टीमने अशा प्रकारच्या हल्ले होणाऱ्या असुरक्षित गावांना भेटी दिल्या. या घटनांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आलं आणि वन अधिकाऱ्यांशी चर्चाही करण्यात आली.

मानवी फेसमास्क

वन अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर या वाघांच्या, बिबट्यांच्या हल्ल्यांवर मार्ग काढण्यात आला. येथील शेतकरी, मेंढपाळ, ग्रामस्थांना मानवी मास्कचं वाटप करण्यात आलं. वाघ, बिबटे मागून हल्ला करतात. त्यामुळे चेहऱ्याच्या मागे मास्क लावल्यास हल्ल्यापासून बचाव होऊ शकतो. पहिल्या टप्प्यात शेतकरी, मेंढपाळ तसंच इतर नागरिकांना १०० मानवी मास्क वाटण्यात आले. तसंच मास्कशिवाय त्यांना वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यापासून कशाप्रकारे बचाव करता येऊ शकतो याचीही माहिती दिली.

वन्य प्राण्यांचे हल्ले

या टीमने हॉटस्पॉट गावांमध्ये वाघांच्या हल्ल्याप्रकरणी काय करावे, काय करू नये असे पोस्टरही लावले आहेत. दुसऱ्या टप्प्यात १४० फेसमास्क वाटण्यात आले. पावसाळ्यात शेतातील पिकं असल्याने मेंढपाळ गुरं चारण्यासाठी १८ किलोमीटरपर्यंत जंगलात जातात. त्यामुळे त्यांच्यावर हल्ल्याचा धोका निर्माण होत असल्याचं आढळून आलं आहे. याआधीही वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी अशाप्रकारच्या युक्तीचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर आता ताडोबा परिसरातील गावांमध्येही ही युक्ती वापरली जात आहे.

हल्ल्यापासून वाचण्यासाठी फेसमास्कचा वापर

पश्चिम बंगालमधील सुंदरबन व्याघ्र प्रकल्पात गावांमध्ये मध गोळा करणाऱ्या स्थानिकांचा जंगली मांजरींशी मोठा संघर्ष होता. या मांजरींच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी ही मास्कची युक्ती अंमलात आणण्यात आली होती. आता ताडोबातील अतिसंवेदनशील भागात फेसमास्कचं वितरण केलं जात आहे. फेसमास्क ही फूलप्रूफ युक्ती असू शकत नाही. परंतु यामुळे ग्रामस्थांचा आत्मविश्वास वाढून काही प्रमाणात हल्ले रोखण्यास मदत होऊ शकते. मास्क असूनही हल्ला होऊ शकतो, त्यामुळे ग्रामस्थांना इतर खबरदारीबाबतही माहिती देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here