मुंबई: लवासा आणि जलसिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांची नाव गुंतली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या १० पैकी किमान ५ नेत्यांना तरी सक्तवसुली संचलनालय अर्थात ED कडून चौकशीसाठी नोटीस येऊ शकते, असे भाकीत भाजपचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर (Ranjeetsingh Naik Nimbalkar) यांनी वर्तवले आहे. अलीकडेच मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक बडा नेता तुरुंगात जाईल, असा इशारा दिला होता. कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जलसिंचन घोटाळ्याची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा रोख राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या दिशेने असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता रणजीतसिंह निंबाळकर यांनी त्याही पुढे जात राष्ट्रवादी काँग्रेसचे १ नव्हे तर ५ मंत्री ईडीच्या रडारवर असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात काय प्रतिक्रिया उमटतात, हे पाहावे लागले.
मोहित कंबोज महाराष्ट्राचे नवे किरीट सोमय्या झाले आहेत का?
रणजीतसिंह निंबाळकर यांनी गुरुवारी यासंदर्भात ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, घोटाळ्यांच्या चौकशीबाबत सरकारला काय वाटते, ते महत्त्वाचे आहे. मी व्यक्तीद्वेष करत नाही. मला त्यामध्ये रस नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते चोर आहेत. त्यामुळे मोहित कंबोज बोलतायत तो चोर नेमका कोण आहे, हे त्यांच्याशी बोलल्यानंतरच कळेल. राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित अनेक विषय आहेत. नुकतंच लवासा प्रकल्पासाठीच्या जमीन हस्तांतरणावरून सर्वोच्च न्यायालयाने संबंधितांना फटकारले आहे. त्या काळात जलसंपदा मंत्री कोण होते? जमिनी कशा दिल्या? त्याचे निकष काय होते?, हे प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे आता लवासा प्रकरणातच चौकशी होते की अन्य विषयावर, हे बघावे लागेल, असे रणजीतसिंह निंबाळकर यांनी म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर बऱ्याच प्रकरणांमध्ये आरोप झाले आहेत. त्यामध्ये कोणाचेही दुमत नाही. त्यामुळे आता चौकशी केल्यानंतरच योग्य गोष्टी पुढे येतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० पैकी किमान ५ नेत्यांना तरी ईडीकडून नोटीस येऊ शकते, असे रणजीतसिंह निंबाळकर यांनी सांगितले.
भाजप नेते मोहित कंबोज यांच्या पाठिशी, ३ बडे नेते म्हणतात, ‘अजितदादांविषयी ते प्लॅनिंग ठरलंय!’
मोहित कंबोज नेमकं काय म्हणाले?

मोहित कंबोज यांनी अलीकडेच काही ट्विटस केली होती. या माध्यमातून मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी राज्यातील आणखी एका बड्या नेत्यावर कारवाई होण्याचे संकेत दिले होते. ट्विटमध्ये कंबोज यांनी अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय पांडे, संजय राऊत यांची नावं लिहली आहेत. त्यानंतर कंबोज यांनी पाचवी जागा रिक्त सोडली आहे. याठिकाणी लवकरच एका नेत्याचा नंबर लागेल, असे संकेत मोहित कंबोज यांनी दिले आहेत. त्यामुळे आता राज्यातील कोणत्या नेत्यावर कारवाई होणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here