आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला आता काय अर्थ
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यात येत असून बंडखोरांच्या मतदारसंघात त्यांच्या सभा पार पडणार आहे. या दौऱ्यावर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. “आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला आता काय अर्थ, त्यांच्या दौऱ्याला आता उशीर झाला आहे. हे काम त्यांनी आधीच करायला पाहिजे होतं. आता पक्षातून सर्व गेले आहेत, सर्व मावळे निघून गेले आहेत, शिलेदार निघून गेले आहेत आणि ते आता दौरे करत आहेत. जर हेच दौरे आधी केले असते तर पक्षाला त्याचा थोडा फायदा झाला असता व आज जी परिस्थिती आहे ती बघायला मिळाली नसती” अशी प्रतिक्रिया यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
शिंदेनी ५० गोविंदांना सोबत घेऊन राजकारणात मोठी दहीहंडी फोडली
शासनाकडे पाठपुरावा करून जळगावात दर्जेदार असे क्रीडा संकुल उभारणार असल्याची माहिती ही यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी बोलताना दिली आहे. त्यासाठी सी. एस. आर असो की इतर काही पण अशी सर्वांची मदत घेण्यात येईल व भव्य व दर्जाला दर्जेदार असे क्रीडा संकुल उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील असे यावेळी मंत्री महाजन म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी ५० गोविंदांना सोबत घेऊन राजकारणात मोठी दहीहंडी फोडली व त्यामुळेच सत्तांतर झाले. त्यामुळे एकनाथ शिंदे जे बोलत आहे ते अगदी सत्य असल्याची प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराचे दुसरे यादीत जळगावातून कुणाला संधी मिळेल असा प्रश्न विचारला असता मंत्री गिरीश महाजन यांनी त्यावर केवळ “जय श्रीराम” म्हणत बोलणे टाळले.