Maharashtra Assembly Session | गोंदिया-भंडारा जिल्ह्यात घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तिसऱ्या आरोपीचा आठ दिवसांपासून शोध घेतला जात आहे. पीडितेने नाव सांगितल्यानंतरही पोलिसांना त्याच्यापर्यंत पोहचता आले नव्हते. या गुन्ह्याच्या तपासासाठी गठीत एसआयटीने भंडारा जिल्ह्यात चौकशी सुरू केली आहे. ३० जुलैला ही महिला भांडण झाल्यामुळे रागाच्या भरात आपल्या घरातून बाहेर पडली होती. आईकडे जाते, असे सांगून ती घराबाहेर पडली.

हायलाइट्स:
- टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाने ३० तारखेला या महिलेवर अत्याचार केले
- दोघांनी रात्री तिला विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर आणून टाकले
- पोलिसांनी या महिलेला एकटीला सोडायला नव्हते पाहिजे
देवेंद्र फडणवीस यांनी अगदी सुरुवातीपासून भंडारा-गोंदिया बलात्कारप्रकरणाचा सविस्तर तपशील सभागृहात मांडला. ही घटना आपल्यासाठी अत्यंत लाजीरवाणी आहे. आपल्याकडच्या पद्धतीत निश्चितच सुधारणेला वाव आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, ३० जुलैला ही महिला भांडण झाल्यामुळे रागाच्या भरात आपल्या घरातून बाहेर पडली होती. आईकडे जाते, असे सांगून ती घराबाहेर पडली. ती रात्रीपर्यंत फिरत होती. त्यावेळी महिलेने वर्णन केल्याप्रमाणे एक टेम्पो ट्रॅव्हलर आली. त्या गाडीचा चालक श्रीराम मुरकुडे याने महिलेला घरी सोडतो, असे सांगितले. महिलेने ड्रायव्हरचे नाव श्रीराम मुरकुडे सांगितले होते, पण तिला आता त्याबाबत खात्री नाही. या महिलेला सायकोसिसची व्याधी आहे. त्यामुळे तिला अनेक गोष्टींचा विसर पडत असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिला.
टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाने ३० तारखेला या महिलेवर अत्याचार केले. ३१ जुलैला त्याने पळस्पे रोडवर पुन्हा एकदा महिलेवर अत्याचार केले, त्यानंतर तिला भंडारा परिसरात सोडून दिले. ती लाखणी परिसरात एका पूलाच्या खाली विमनस्क अवस्थेत बसून होती. तेथील पोलीस पाटलांना ही महिला दिसली. तिच्यासोबत काहीतरी घडले आहे, असा अंदाज पोलीस पाटलांना आला. मात्र, तिची विचारपूस केल्यानंतर महिला काही बोलली नाही. तेव्हा पोलीस पाटलांनी ११२ क्रमांकावर फोन केला. त्यानंतर पोलिसांची गाडी आली आणि महिलेला घेऊन गेली. पोलीस स्टेशनमध्ये नेले तेव्हा या महिलेचे कपडे व्यवस्थित होते. पोलिसांनी तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण तिने पोलिसांना काही सांगितले नाही. तोपर्यंत रात्र झाल्यामुळे पोलिसांनी या महिलेला पोलीस स्टेशनमध्येच थांबवून घेतले. अखेर सकाळी साडेसातच्या सुमारास तिने मी चहा प्यायला बाहेर पडते, असे सांगितले. त्यानंतर ही महिला बाहेर पडली आणि पुढे चालत गेली. संध्याकाळपर्यंत ती कारघा परिसरातील एका धाब्याजवळ पोहोचली. याठिकाणी ती बसली असताना त्याठिकाणी अमित साळवे उर्फ लुख्खा बाईक घेऊन आला. मी तुला घरी सोडतो, अशी बतावणी त्याने केली. मात्र, त्यानंतर अमित साळवे आणि त्याचा मित्र इजाज अन्सारी यांनी महिलेला जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. त्यावेळी महिलेने आरडाओरडा केला. तेव्हा या दोघांनी रात्री तिला विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर आणून टाकले. दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वाआठच्या सुमारास ही महिला एका नागरिकाच्या दृष्टीस पडली. त्याने याबाबत पोलिसांना कळवले. जखमी अवस्थेतील महिलेला रुग्णवाहिकेने भंडाऱ्यात आणले. तिची तपासणी करण्यात आली असता तिच्यावर रिकन्स्ट्रक्शनची शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या महिलेला पुढील उपचारांसाठी नागपूरमध्ये नेण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आम्ही जे भोगलं, तेच वागलो; फडणवीसांनी अजितदादांना जुन्या निधी वाटपांची आठवण करून दिली
पोलिसांकडून गंभीर चूक: फडणवीस
याप्रकरणात अनेक गंभीर चुका झाल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली. पोलिसांनी या महिलेला एकटीला सोडायला नव्हते पाहिजे. जरी ती महिला निघून गेली होती, तरी ती परत न आल्यानंतर पोलिसांनी तिचा तपास करायला पाहिजे होता. पण ही महिला संध्याकाळपर्यंत पायी चालत कारघ्याला पोहोचली, तोपर्यंत पोलिसांना पत्ता नव्हता. ही गंभीर चूक होती. याप्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या महिलेला सायकोसिसची व्याधी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुरुवातीला ही महिला ज्या व्यक्तीने बलात्कार केल्याचे सांगत होती, त्याच्याबाबतचा जबाब तिने बदलला आहे. आता ही महिला, ‘त्या व्यक्तीने मला खूप चांगले वागवले, मी त्याच्याविरुद्ध तक्रार करणार नाही’, असे म्हणत आहे. सध्या एसआयटीमार्फत याप्रकरणाची चौकशी होत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.