माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघात मुश्रीफ यानाच मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कागल शहराच्या नगराध्यक्षा सौ. माणिक माळी व त्यांचे पती कागलचे माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत सिंह घाटगे यांच्या गटात प्रवेश केला आहे.
कोल्हापुरातील नागाळापार्कयेथील कागल हाउस या निवासस्थानी दोघांनी आपल्या कार्यकर्त्यांसकट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ गटाला मोठा धक्का असल्याचे सध्या म्हटले जात आहे. माणिक माळी या पाच वर्षांपूर्वी कागल नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्षा म्हणून माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या गटातून नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या आहेत.
नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुश्रीफ गटातून राजे गटात केलेला प्रवेश म्हणजे मुश्रीफ गटाला मोठा धक्का मानला जात आहे. याआधी मुश्रीफ गटातून राजे गटात माजी नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष आनंदा पसारे, संतोष सोनुले यांनीही प्रवेश केला आहे. कागल शहर हे आमदार हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला आहे. मात्र समरजीत सिंह घाटगे यांनी मुश्रीफांच्या बालेकिल्लाला सुरुंग लावण्याचे काम केले आहे.