मुंबई: झी मराठीवरील ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अभिनेता सुबोध भावेचं दमदार सूत्रसंचालन आणि राजकीय क्षेत्रातील महिलांच्या तुफान फटेकबाजीने कार्यक्रम बघणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढते आहे. सध्या शिवसेनेत झालेल्या बंडाने अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालीये. ४० आमदार आणि १२ खासदारांनी ठाकरेंची साथ सोडल्याने शिवसेना पक्ष अक्षरश: खिळखिळा झालाय. अशा सगळ्या परिस्थितीत या आठवड्यात ‘बस बाई बस’ कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत शिवसेना नेत्या तथा मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर….

कार्यक्रमातील एका राऊंडमध्ये किशोरी पेडणेकर यांना काही गाणी ऐकवली जातात. वेगवेगळ्या राजकीय परिस्थितीला अनुसरुन गाण्यांची निवड करण्यात आलेली होती. किशोरी पेडणेकरांनीही संबंधित गाणं ऐकल्यावर कुणाचा चेहरा आठवतो, हे अगदी बिनधास्तपणे सांगितलं. काही हळव्या क्षणांवेळी शिवसेना, पक्षनेतृत्व आणि शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांच्या आठवणी त्यांनी जागवल्या तर भाजपवर बाण सोडण्याची संधी मिळताच त्यांनी क्षणाचाही वेळ न दवडता आपल्या भात्यातील बाणाने प्रतिस्पर्ध्यांचा वेध घेतला.

‘कोण होतीस तू काय झालीस तू, अगं वेडे कशी वाया गेलीस तू?’ हे गीत ऐकताच किशोरी पेडणेकरांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं नाव घेतलं. मुंबई पालिकेतल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी असताना चित्रा वाघ त्यांच्यावर सातत्याने टीका करत होत्या. त्यावेळी चित्रा वाघांना उत्तर द्यायला किशोरी पेडणेकर आघाडीवर असत. गेल्या काही महिन्यांपासून पेडणेकर vs वाघ हा सामना अनेक वेळा रंगला. आताही ‘बस बाई बस’च्या मंचावरुन पेडणेकरांनी चित्रा वाघ यांना डिवचण्याची संधी सोडली नाही.

मॅनेज झाल्याचा आरोप, समन्वयकांना नेतृत्व अमान्य, संभाजीराजेंचं भल्यामोठ्या पोस्टमधून रोखठोक उत्तर
‘जाने कहाँ गए वो दिन’ हे आठवणीत रमायला लावणारं हशरत जयपुरी लिखित मुकेश यांचं गीत किशोरी पेडणेकरांना ऐकवलं. हे गीत ऐकताच पेडणेकरही जुन्या आठवणीत रमल्या. त्यांना शिवसेनेतल्या जुन्या नेतृत्वाची आणि जुन्या दिवसांची आठवण झाली. हे गीत ऐकताच त्यांनी मनोहर पंतांच्या आठवणी जागवल्या. राज्याचे पहिले शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याबद्दल पेडणेकर भरभरुन बोलल्या.

‘दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा…’ हे गाणं ऐकताच पेडणेकरांना आठवण झाली देवेंद्र फडणवीसांची. मुख्यमंत्रिपदावरुन भाजप शिवसेनेचा काडीमोड झाला. महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. अडीच वर्षांचं यशस्वीपणे सरकार चालवल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडाने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं. या सगळ्यात देवेंद्र फडणवीस सातत्याने शिवसेनेला पर्यायाने उद्धव ठाकरेंना टार्गेट करत राहिले. खरंच २५ वर्ष भाजप-सेनेची मैत्री होती का? असा प्रश्न पडावा इतकं दोघांमधलं मित्रत्वाचं नातं विकोपाला गेलं.

‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?’ हे गीत ऐकल्या ऐकल्या पेडणेकरांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं नाव घेतलं. त्यावर सुबोध भावेंनी ‘का?’ असं विचारताच पेडणेकरांनी मिश्किल अंदाजात प्रतिक्रियाही दिली. नाना पटोले जबाबदारीच घेत नाहीत, सारखी जबाबदारी झटकत असतात, असं म्हणत पेडणेकरांनी काँग्रेसच्या नेमक्या परिस्थितीवर बोट ठेवलं.

उद्धव ठाकरेंच्या साथीला संभाजी ब्रिगेडची फौज, युतीच्या घोषणेनंतर आता मुंबईत जंगी मेळावा
‘दिस जातील, दिस येतील, भोग सरल सुख येईल…’ हे गीत ऐकल्यावर पेडणेकरांनी अडचणीत असलेल्या उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं. संकटे येत असतात, त्यांना तोंड द्यावं, संकटात खचून जाऊ नये, असा संदेशच या गीतामधून दिला गेला आहे. शिवसेनेलाही नवी पालवी फुटेल, नवे अंकुर बहरतील, पुन्हा नव्या जोमाने शिवसेना उभी राहील, असा आशावाद यानिमित्ताने पेडणेकरांनी व्यक्त केला

‘क्या हुआ तेरा वादा.. ‘हे गीत आश्वासनांची, वचनपूर्तीची आठवण करुन देणारं गीत आहे. हे गीत ऐकल्यावर पेडणेकरांना आठवण झाली एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनाची… ज्यावेळी उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांच्या बंडाची चाहुल लागली, त्यावेळी त्यांनी शिंदेंना बोलावून घेऊन त्याबद्दल विचारलं. पण एकनाथ शिंदेंनी अशा बातम्यांचं खंडन करत मी मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही, असं स्पष्ट केलं. पण पुढच्या दोन आठवड्यांत जे काही झालं, ते महाराष्ट्र जाणतो. याच अनुषंगाने पेडणेकरांना क्या हुआ तेरा वादा हे गीत ऐकल्याबरोबर एकनाथ शिंदे यांची आठवण झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here