जिल्ह्यातून एकूण २ हजार ७७७ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी २७११ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात निगेटिव्ह आलेले नमुने २५६४ आहेत. सध्या जिल्ह्यात विलगीकरणात १२१ रुग्ण उपचार घेत आहेत. संस्थात्मक अलगीकरणात २१२२२ व्यक्ती आहेत आणि गाव पातळीवर १९ हजार ३३५ जणांना संस्थात्मक करण्यात आले आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त असले तरी रुग्णसंख्या दररोज वाढत आहे, ही मोठी चिंतेची बाब बनली आहे. बुधवारी आलेल्या चाचणी अहवालांपैकी सात जणांना करोनाची बाधा झाली आहे आणि हे सर्व सावंतवाडीतील आहेत. त्यात तालुक्यातील इन्सुली-क्षेत्रफळवाडी येथील तीन, देऊळवाडा येथील एक आणि मळेवाड येथील तीन रुग्णांचा समावेश आहे.
२ मे पासून जिल्ह्यात , नवी मुंबई, ठाणे भागातून जवळपास ८५ हजारपेक्षा अधिक मुंबईकर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांची व्यवस्था करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. येत्या काळात गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चाकरमान्यांची मोठी गर्दी जिल्ह्यात होणार आहे. त्यावेळी प्रशासनासमोर नवीन प्रश्न निर्माण होणार आहेत. पालकमंत्री , जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित कुमार गेडाम या संपूर्ण स्थितीवर नजर ठेवून आहेत. स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक नियोजन केले जात आहे. दुसरीकडे सुरुवातीला असलेले कडक निर्बंध आता काही प्रमाणात शिथील करण्यात आल्याने शिस्त बिघडत असल्याचेही समोर आले आहे. त्याला लगाम लावण्याचे आव्हान प्रशासनापुढे असेल.
कोविड चाचणी आणि माकडतापाचेही निदान शक्य
सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयात ट्रूनॅट मशीनद्वारे करोना चाचणी सुरू झाली आहे. आमदार वैभव नाईक आणि जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी या यंत्रसामग्रीची पाहणी करून समाधान व्यक्त केले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात ट्रूनॅट मशीनद्वारे तपासणीची परवानगी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिली आहे. आता माकड तापाचेही निदान करणारी प्रयोगशाळा जिल्हा रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आली आहे. आजवर हे नमुने पुणे किंवा मणिपालला पाठवले जायचे. आता ही सोय जिल्ह्यात झाली आहे.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines