धुळे: एकीकडे संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना दुसरीकडे मात्र दलितांवर सार्वजनिक बहिष्कार टाकण्याच्या घटना घडत आहेत. धुळे तालुक्यातील मेहेरगाव येथे पोळा सण साजरा करताना गावातील जातीयवादी मानसिकतेच्या लोकांनी दलित तरुणांनी काढलेली बैलांची मिरवणूक अडवून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच गावातील संपूर्ण दलित वस्तीवर बहिष्कार टाकला आहे. शिवाय यामध्ये गांभीर्याचे म्हणजे पोलिसांनीही दलित समाजाच्या तरुणांवर नाहक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप गावातील दलित कुटुंबाने लावला आहे. (the dalit community in dhule has been boycotted)

ही घटना म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रासाठी अतिशय निंदनीय बाब असून अशा जातीयवादी मानसिकतेच्या लोकांवर पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी करत आज मेहेरगाव येथील गावातील दलित समाजबांधवांनी आणि काही सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. पीडितांनी आपली कैफियत जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याकडे मांडली.

महाराष्ट्र पोलिसांना पडलाय मोठा प्रश्न; हा २० लाखांचा माल आणि ट्रक कुणाचा? दोघांना घेतले ताब्यात
यासंदर्भात जिल्हाप्रशासनाला आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल लेखी निवेदनही देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, ‘मेहेरगाव येथे बैल पोळ्यानिमित्त दलित तरुणांनी काढलेली मिरवणूक काही जातीयवादी लोकांनी अडविली. तसेच जबर मारहाण करत लाठीकाठ्यांनी हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. परंतु, अद्याप एकालाही अटक केलेली नाही. सवर्ण समाजाने गावात बैठक घेवून व पोलिस प्रशासनावर दबाव टाकून बौध्द समाजाच्या तरुणांवर ३९५ सारखा गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल केला.’

ऑनलाईन व्यवहारांनी भुरटे चोर टेन्शनमध्ये, पाकीटमारी घटली, महिन्यात फक्त एकच तक्रार
तसेच इतक्यावर न थांबता गावातील जातीयवादी लोकांनी गावातील सर्वच दलित वसतीवर बहिष्कार टाकला आहे. दलितांना किराणा देऊ नये, सालदार व शेतात कामाला ठेवू नये, न्हाव्याने दलित लोकांची दाढी, कटींग करु नये, जो दुकानदार किराणा देईल त्याला गावात बोलावून चौकात ठोकायचे आणि त्याच्याकडून एक ते पन्नास हजार रुपये दंड आकारावा, असा निर्णय गावातील सवर्ण लोकांनी घेतला आहे.

ट्रकमध्ये सापडले सव्वा कोटींचे घबाड, मुंबई – आग्रा महामार्गावर मोठी कारवाई
ही निंदनीय बाब असून धुळे तालुक्यातील सोनगीर पोलिसांनी देखील शिक्षण घेणाऱ्या दलित तरुणांवर गुन्हे दाखल करुन त्यांच्या आयुष्याशी खेळण्याचे काम केले आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करुन न्याय द्यावा, अशी मागणी मेहेरगांव येथील ग्रामस्थांनी यावेळी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here