नितीन गडकरी शुक्रवारी पुणे दौऱ्यावर होते. पुण्यातील चांदणी चौकात ट्रॅफिकच्या समस्येने हैरान झालेल्या लोकांना दिलासा देण्याकरिता तेथील पूल पुढच्या दोन-चार दिवसांत जमीनदोस्त करु, असं गडकरींनी सांगितलं. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या मनातील विविध संकल्पना बोलून दाखवल्या. या संकल्पनांमध्ये पुन्हा हवेत उडणारी कार, रोपवे बस पाण्यापासून हायड्रोजन निर्मिती करण्याचा मानस गडकरींनी बोलून दाखवला. याच पार्श्वभूमीवर गडकरींनी मागील काही वर्षात केलेल्या अशा उडत्या घोषणा कोणत्या, त्या आपण पाहुयात….
पुणेकर हवेत उडणार!
“पुणे शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी नितीन गडकरी यांनी उडत्या बसचा पर्याय दिला आहे. केंद्र सरकार निधी द्यायला तयार आहे, महापालिकेने तसा प्रस्ताव द्यावा”, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.
“देशभर १६५ रोप वे आम्ही बांधत आहोत. त्यासाठी महाराष्ट्रातील काही प्रस्ताव आहेत. पुणे शहराच्या वाहतूक कोंडीचा पीएमआरडीने अभ्यास करावा. आमच्याकडे हवेत उडणारी बस आहे. १२० ते १५० लोक त्यातून प्रवास करु शकतात. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी एकत्र बसून चर्चा करावी. निधीची चिंता नाही. केंद्र सरकार निधी द्यायला तयार आहे”, असं नितीन गडकरी म्हणाले.
माझी एकच इच्छा, मला पेट्रोल डिझेल बंद करायचंय
“गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नितीन गडकरी यांच्या हस्ते सिंहगड पुलाचं उद्घाटन झालं होतं. या उद्घाटनपर भाषणात त्यांनी विकासकामांच्या अनुषंगाने मनातल्या इच्छा बोलून दाखवल्या होत्या. आता माझी एकच इच्छा आहे, मला पेट्रोल डिझेल बंद करायचंय आणि माझी ही इच्छा फक्त शेतकरीच पूर्ण शकतात, असा आशावाद गडकरींनी बोलून दाखवला होता.
“मी राहुल बजाज यांचे चिरंजीव आणि टीव्हीएसचे श्रीनिवासन यांना म्हटलं, जेव्हापर्यंत तुम्ही इथेनॉल स्कूटर बनवत नाही, तोपर्यंत माझ्यापर्यंत येऊ नका. मी तुमचं काम करणार नाही. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत त्या दोघांनी इथेनॉल इंजिन बनवलं. ब्राझीलमध्ये १०० टक्के इथेनॉल आहे”, अशी आठवणही त्यांनी त्यावेळी केलेल्या भाषणात सांगितली.
पाण्यापासून हायड्रोजन निर्मिती आणि हायड्रोजनपासून कार-गाडी चालणार
नितीन गडकरींनी देशात पाण्यापासून हायड्रोजन निर्मिती करण्याचा मानस बोलून दाखवला आहे. पेट्रोलपेक्षा खूपच कमी किमतीत हायड्रोजन उपलब्ध होऊ शकतो आणि त्याच माध्यमातून देशात फक्त कारच नव्हे तर ट्रेन आणि विमानसेवासुद्धा हायड्रोजनच्या सहाय्यातून सुरु करु शकतो, असं गडकरी म्हणाले होते.
टोल नाक्यांची झंझट नको, ते कायमचे बंद करु
टोल नाक्यांवरच्या गर्दीवर उपाययोजना म्हणून देशातील सगळे टोलनाके बंद करण्याची नितीन गडकरी यांची कल्पना आहे. टोल नाक्यांच्याजागी आधुनिक प्रणालीवर काम करणं सुरु असल्याचं गडकरींनी सांगितलं होतं. तसेच सॅटेलाईटच्या मदतीने गाडीची नंबर प्लेट स्कॅन करून आपोआप बँकेतून टोल आकारला जाईल, अशी गडकरींची संकल्पना आहे.