tata sons former chairman | टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर सायरस मिस्त्री हे बाकीच्या गोष्टींपासून दूर राहिले. आजच्या त्यांच्या अपघाती निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. ज्या पद्धतीने त्यांच्या गाडीचा अपघात झाल्याचे ऐकायला मिळाले, ते ऐकून असं काही घडेल यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. मिस्त्री कुटुंबांबाबत संकटांची दुर्दैवी मालिकाच सुरु आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली.

हायलाइट्स:
- सायरस मिस्त्री कामानिमित्त काहीवेळा ते मला भेटले होते
- मृदूभाषी, अधिक मेहनत करणारे आणि व्यवसायात बारीक लक्ष घालणारे
सायरस मिस्त्री यांनी ज्या काळात टाटा समूहाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा कामानिमित्त काहीवेळा ते मला भेटले होते. पण नंतरच्या काळात सायरस मिस्त्री माझ्या संपर्कात नव्हते, असे शरद पवार यांनी सांगितले. सायरस मिस्त्री यांचे अकाली निधन हा देशाच्या उद्योगविश्वासाठी मोठा धक्का असल्याचे त्यांनी म्हटले. सायरस मिस्त्री हे मृदूभाषी, अधिक मेहनत करणारे आणि व्यवसायात बारीक लक्ष घालणारे होते. त्यांनी टाटा सन्समधील आपल्या छोट्या कारकीर्दीत अनेक बदल घडवून आणल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
यावेळी शरद पवार यांनी देशाच्या विकासात शापुरजी पालनजी कुटुंबाने दिलेल्या योगदानाचा आवर्जून उल्लेख केला. महाराष्ट्रात आणि देशात काही पारशी कुटुंबांनी प्रसिद्धीपासून दूर राहत विविध क्षेत्रात देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले. अशा पारशी कुटुंबांच्या नामावलीवर नजर टाकल्यास त्यामध्ये फारसं प्रसिद्ध नसलेल्या शापुरजी पालनजी कुटुंबांचं नाव घ्यावं लागेल. शापुरजी-पालनजी यांनी महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. एक काळ असा होता की, टाटा समूहात टाटांपेक्षा जास्त भांडवली गुंतवणूक शापुरजी पालनजी कुटुंबाची होती. नंतरच्या काळात टाटांनी आपली गुंतवणूक वाढवत नेली. याच शापुरजी पालनजी कुटुंबातील पुढच्या पिढीचे प्रतिनिधित्व सायरस मिस्त्री करत होते. सायरस यांचा मृत्यू हा खूपच धक्कादायक असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.