cyrus mistry death: टाटा सन्सचे माजी संचालक सायरस मिस्त्री यांचं काल कार अपघातात निधन झालं. अहमदाबादहून मुंबईला येत असताना पालघरमध्ये त्यांच्या कारला अपघात झाला. भरधाव कारनं दुभाजकाला धडक दिली. त्यात मिस्त्री यांचा मृत्यू झाला.

मिस्त्री यांची कार भरधाव वेगात दुभाजकाला धडकली. कारचा वेग खूप असल्यानं धडक बसताच मिस्त्री यांचं डोकं समोरच्या सीटवर आदळलं. त्यांच्या शरीरातील अनेक अवयवांना इजा झाली. वैद्यकीय भाषेत याला पॉलीट्रोमा म्हटलं जातं. त्यामुळेच मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. मिस्त्री मर्सिडीज कारमधून मुंबईच्या दिशेनं येत होते. अपघात इतका भीषण होता की त्यांच्या कारच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला.
सायरस मिस्त्री यांच्या कुटुंबातील बहुतांश सदस्य परदेशांमध्ये वास्तव्यास आहेत. ते आज रात्रीपर्यंत मुंबईत पोहोचतील. सायरस यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होतील. पालघर पोलीस मिस्त्री यांच्या कारला झालेल्या अपघाताचा तपास करत आहेत. यासाठी पोलिसांनी एका स्वयंसेवी संस्थेची मदत घेतली आहे. हायवेवर होणाऱ्या अपघातांचं विश्लेषण आणि अभ्यास करण्याचं काम ही संस्था करते.
सायरस मिस्त्री आणि त्यांचा मित्र जहांगीर कारच्या मागील सीटवर बसले होते. दोघांनी सीट बेल्ट लावला नव्हता अशी माहिती पोलिसांनी दिली. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कारला अपघात झाला. कारचा वेग अतिशय जास्त होता. पालघरमधील चारोटीचा टोल नाका ओलांडल्यानंतर कारनं अवघ्या ९ मिनिटांत २० किलोमीटर अंतर कापलं.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.