कळमनुरी ते आखाडा बाळापुर मार्गावर माळेगाव पाटीजवळ भरधाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. रविवारी (ता. ४) रात्री ही घटना घडली .माधव विश्वंभर कल्याणकस्तुरे (वय ३८,रा. पोखरणी ता. कंधार) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंधार तालुक्यातील पोखरणी येथील माधव कल्याणकस्तुरे हे एका महिन्याभरापासून कळमनुरी परिसरामध्ये मंदिराच्या बांधकामासाठी येत होते. रविवारी रात्री ते आपल्या दुचाकीने कळमनुरीकडे येत होते.त्यांची दुचाकी कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावर माळेगाव पाटीजवळ आली असताना कळमनुरीकडून आखाडा बाळापुरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला समोरुन धडक दिली.
अपघातामध्ये माधव यांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कळमनुरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सोनुळे ,जमादार रिठ्ठे, अरविंद राठोड, प्रशांत शिंदे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी मयत माधव यांचा मृतदेह कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी ट्रक चालकाला तातडीने ताब्यात घेतली आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मयत माधव हे नेमक्या कोणत्या गावात काम करत होते याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना नाही. त्यामुळे पोलिस मयत माधव यांच्या भ्रमणध्वनीवरून ते कुठल्या गावाला काम करत होते याचा शोध घेत आहेत.
हाफकीन कोण आहे, हाफकीन माणसाबद्दल बोललेलं दाखवा, मी ताबडतोब राजीनामा देतो | तानाजी सावंत