Maharashtra Politics | अमित शाह मुंबईत येऊन गेल्यानंतर भाजपचा महानगरपालिका निवडणुकीसाठीची फॉर्म्युला निश्चित झाला आहे. भाजपकडून २२७ वॉर्डांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रत्येक वॉर्डातील मतदानाचे विश्लेषण करुन विशेष रणनीती तयार करण्यात आली आहे. मात्र, ८० ३० ४० च्या फॉर्म्युलामध्ये शिंदे गट आणि मनसेला तुर्तास तरी कोणतेही स्थान दिसत नाही.

हायलाइट्स:
- १५० जागांची ८०-३०-४० अशाप्रकारे विभागणी
- १५० जागा जिंकण्याचे लक्ष्य
- ४० जागांवरील ताकदवान उमेदवार गळाला लावण्यासाठी प्रयत्न
काय आहे ८०-३०-४० चा फॉर्म्युला?
‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, भाजपचे मुंबई महानगरपालिकेच्या १५० जागांची ८०-३०-४० अशाप्रकारे विभागणी केली आहे. यापूर्वी २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ८२ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे या जागा पुन्हा जिंकण्याचे भाजपचे प्रमुख लक्ष्य आहे. त्यासाठी २०१७ मध्ये विजयी झालेल्या भाजप नगरसेवकांना संधी दिली जाईल. तर २०१७ मध्ये भाजपचे उमेदवार ३० जागांवर दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. या जागा यंदाच्या निवडणुकीत जिंकण्याचा चंग भाजपने बांधला आहे. तर मुंबईतील ४० जागा अशा आहेत की, ज्याठिकाणचे उमेदवार स्वबळावर निवडून येतात. त्यामुळे या ४० जागांवरील ताकदवान उमेदवार गळाला लावण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जातील. जेणेकरून हे उमेदवार जिंकल्यास भाजपचे महानगरपालिकेतील संख्याबळ वाढेल. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये इतर पक्षांमधून इनकमिंग होण्याची शक्यता आहे.
भाजपकडून २२७ वॉर्डांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रत्येक वॉर्डातील मतदानाचे विश्लेषण करुन विशेष रणनीती तयार करण्यात आली आहे. मात्र, ८० ३० ४० च्या फॉर्म्युलामध्ये शिंदे गट आणि मनसेला तुर्तास तरी कोणतेही स्थान दिसत नाही. शिंदे गटाला भाजपने सोबत घेतल्यास ज्या वॉर्डमध्ये शिवसेनेचे एकापेक्षा जास्त तुल्यबळ उमेदवार आहेत, त्याठिकाणी या दोन्ही उमेदवारांमध्ये लढत होऊन मराठी मतांची विभागणी होईल, असा भाजपचा अंदाज आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.
ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, धोका देणाऱ्यांना शिक्षा करा: अमित शाह
अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यावेळी ‘मेघदूत’ बंगल्यावर मुंबईतील भाजप नगरसेवक पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यावेळी अमित शाह यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. फक्त दोन जागांसाठी शिवसेनेने २०१४ मध्ये युती तोडली, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धोका दिला, त्यांना शिक्षा दिल्याशिवाय स्वस्थ बसू नका, असे आदेश अमित शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिले होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.