Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉमUpdated: Sep 7, 2022, 4:43 PM
Maharashtra Politics | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) तीन दिवसीय बारामती दौऱ्यावर असणार आहेत. २२ ते २४ सप्टेंबर दरम्यान त्या बारामती लोकसभा मतदारसंघाची पाहणी करतील, नवी व्यूव्हरचना आखतील. यावरुन जयंत पाटील यांनी भाजपला लक्ष्य केले. यापूर्वी अनेकांनी बारामती टार्गेट करून खोदून पाहिले, पण कोणाला पाणी लागली नाही. त्यामुळे हा प्रयत्न आजचा नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

हायलाइट्स:
- शिवसेना विरुद्ध शिंदे गटाच्या न्यायालयीन सुनावणीवरही भाष्य
- अनेकांनी बारामती टार्गेट करून खोदून पाहिले, पण कोणाला पाणी लागले नाही
- भाजपचे हे प्रचार तंत्र आहे
यावेळी जयंत पाटील यांनी अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे यंदा ‘मिशन महाराष्ट्र’ बरोबर ‘मिशन बारामती’ असल्याचे विधान करत शरद पवार टार्गेट असल्याचे स्पष्ट केले होते.यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी जोरदार टोला लगावला. जयंत पाटील यांनी म्हटले की, यापूर्वी अनेकांनी बारामती टार्गेट करून खोदून पाहिले, पण कोणाला पाणी लागले नाही. त्यामुळे हा प्रयत्न आजचा नाही. भाजपचे हे प्रचार तंत्र आहे. पण एखाद्या वेळी सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र शरद पवारांना बारामतीकर कधी सोडणार नाहीत,असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
तसेच शिवसेना विरुद्ध शिंदे गटाच्या न्यायालयीन सुनावणीवरही त्यांनी भाष्य केले. सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी २७ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली. याबद्दल जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. वेळ लागू शकतो पण एवढा ही वेळ लागू नये,की विधानसभेची मुदत संपेल.आता याबाबत एकदा सुनावणी सुरू झाल्यास ती लवकर पूर्ण करून निर्णय दिल्यास महाराष्ट्रातील सर्व गोष्टी क्लिअर होतील,असे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
बारामतीचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी दिल्लीतून नियोजन
आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन बारामतीचा दौरा करणार आहेत. त्यासाठी भाजपचे नेते आत्तापासूनच या मतदारसंघात ठाण मांडून बसले आहेत. भाजप आमदार राम शिंदे यांनी पवार कुटुंबीयांना नुकताच इशाराही दिला होता. अमेठीचा किल्ला आम्ही जसा सर केला तसा यंदा बारामतीचा किल्ला सर करणारच. २०१४ साली आम्ही अमेठीत हरलो पण आमच्या सातत्यपूर्ण कामगिरीने आम्ही २०१९ ला यश मिळवले. राहुल गांधींनी वायनाड मतदारसंघ शोधला होता. आता सुप्रिया सुळे यांनीही त्यांचा ‘वायनाड’ शोधावा. कारण बारामतीचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी दिल्लीतून नियोजन सुरु आहे, यंदा काहीही झालं तरी बारामतीचा गड सर करणारच, असा निर्धार राम शिंदे यांनी व्यक्त केला होता.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.