सामना संपल्यानंतर बाबर पुरस्कार सोहळ्यात बोलताना म्हणाला, “खरं सांगायचं तर ड्रेसिंग रुममध्ये खूप तणावाचं वातावरण होतं. गेल्या काही सामन्यांप्रमाणे या सामन्यातही आम्हाला उत्तम भागीदारी करता आली नाही. मात्र, नसीमने ज्या प्रकारे सामना संपवला, त्यानंतर मात्र ड्रेसिंग रुममध्ये एकच जल्लोष झाला. मला नसीम शहावर विश्वास होता. तो सामना फिरवणार याची मला खात्री होती”
बाबरने भारताच्या जखमेवर मीठ चोळले
भारताविरुद्ध जावेद मियांदादने १९८६ मध्ये याच मैदानावर शेवटच्या चेंडूवर मारलेल्या षटकाराशी बाबरने नसीमच्या षटकाराची तुलना केली. ‘मी नसीमला अशी तोडफोड फलंदाजी करताना पाहिलं आहे, त्यामुळे माझा त्याच्यावर विश्वास होता. या मैदानावर मला मियांदादच्या सिक्सची आठवण झाली, असं म्हणत त्याने पाकच्या विजयानंतर आणि अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर भारताला डिवचण्याची संधी सोडली नाही.
अफगाणिस्तानच्या गोलंदाजीचं कौतुक
बाबर आझमने अफगाणिस्तानच्या गोलंदाजीचं कौतुक केलं. “राशीद खान, मुजीब उर रहमान आणि मोहम्मद नबी हे सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहेत. त्यामुळे तुम्हाला त्यांच्याविरुद्ध खेळताना खूप समजून उमजून खेळण्याची गरज असते”
आम्ही झुंजलो-लढलो, सामन्यात कुठल्याच क्षणी हार मानली नाही
अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने आपल्या गोलंदाजांचे कौतुक केले. परंतु संघाच्या पराभवानंतर निराशा देखील व्यक्त केली. “आमच्या खेळाडूंनी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात अप्रतिम कामगिरी केली. आम्ही पुन्हा सामना आमच्या बाजूने फिरविण्यात अपयशी ठरलो. आम्ही सामन्यात कुठल्याच क्षणी हार मानली नाही. मी फारुकीला शेवटच्या षटकात अचूक यॉर्कर किंवा स्लो बाउन्सर टाकायला सांगितले होते”