१९४८ मध्ये पाळजकरांनी गणेश उत्सवाच्या काळात या लाकडी मूर्तीची स्थापना केली होती. त्याकाळात गावात भयंकर रोगराई पसरली होती. अनेकजण मृत्यूमुखी पडले होते. तेव्हा रोगराई नष्ट करण्यासाठी गणपती बसवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. तेलंगणा राज्यातील निर्मल येथील कारागीर गुंडप्पा यांना पन्नास रुपये देऊन ही लाकडी मूर्ती बनवून घेण्यात आली. गावात गणरायाचे आगमन झाले. गणेशोत्सवाच्या काळात गावातील गंगाधर शेट्टी नावाच्या व्यक्तीला स्वप्न पडले. या लाकडी मूर्तीचे विसर्जन करू नये असे स्वप्न शेट्टी यांना पडले. या लाकडी मूर्तीऐवजी गावातील देशमुखांनी बसवलेली छोटी मूर्ती विसर्जित करावी अशी आज्ञा शेट्टी यांना गणरायाने दिली. दुसऱ्या दिवशी शेट्टी यांनी गावकऱ्यांना आपल्या स्वप्नाबद्द्ल माहिती दिली. गावकरीदेखील तयार झाले आणि गावात पसरलेली रोगराई नाहिशी झाली. तेव्हा या गणपतीला गावाचा रक्षणकर्ता मानले जाते. ७५ वर्षांपासून आजपर्यंत या लाकडी मूर्तीचे विसर्जन केले जात नाही.
संतान गणपती म्हणून देखील या गणपतीची ख्याती आहे. ज्यांना अपत्य नाही, त्यांनी ईथे नवस केल्यास त्यांना अपत्य प्राप्ती होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. नवसाचीदेखील अनोखी परंपरा इथे आहे. नवसाचा नारळ इथे बांधला जातो. मंदिरात येऊन नवस करायचा आणि नारळाला भगव्या कापडात बांधून मंदिराच्या बाजूला ठेऊन द्याचा. जेव्हा नवसपूर्ती होईल तेव्हा पुन्हा दर्शनाला येऊन नारळाची गाठ सोडण्याची प्रथा आहे. बहुतांश भाविक अपत्य प्राप्तीसाठी नवसाचा नारळ बांधतात. इथे केलेला नवस पूर्ण होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.
पाळजच्या लाकडाच्या गणपतीवर भाविकांची अपार श्रद्धा आहे. सुरुवातीला हे गाव तेव्हाच्या आंध्रप्रदेशात होते. राज्य निर्मितीनंतर गावाचा महाराष्ट्रात समावेश झाला. आताही गावात तेलगु भाषिकांची संख्या जास्त आहे. गणेशोत्सवातदेखील आंध्र आणि तेलंगणातील भाविक इथे गर्दी करतात.