Maharashtra Politics | अनंत चतुदर्शीच्या दिवशी प्रभादेवी परिसरात रस्त्यावरुन मार्गस्थ होणाऱ्या गणेश मंडळांना पाणी आणि सरबताचे वाटप करण्यासाठी शिवसेनेने नेहमीप्रमाणे मंच उभारला होता. याच मंचाच्या बाजूला शिंदे गटातील समाधान सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांनीही आपला मंच उभारला होता. शुक्रवारी रात्री मिरवणूक सुरु असताना शिवसैनिक आणि शिंदे गटात बाचाबाची झाली. समाधान सरवणकर यांनी माईकवरुन म्याव-म्यावचा काढला.

हायलाइट्स:
- शिवसैनिक आणि शिंदे गटात प्रभादेवीत राडा
- पाच शिवसैनिकांना अटक
- २५ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल
अरविंद सावंत यांच्यानंतर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, अनिल परब आणि अंबादास दानवेही हे देखील पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांविरोधात केलेल्या कारवाईचा तीव्र निषेध केला. पोलिसांनी शिवसैनिकांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांच्या तक्रारीवरुन आमच्या कार्यकर्त्यांविरोधात पोलीस तक्रार दाखल करतात. मग आमच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून सदा सरवणकर यांना पोलीस अटक का करत नाहीत, असा सवाल अरविंद सावंत उपस्थित केला. पोलिसांनी याप्रकरणात आमचे म्हणणे ऐकून सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, जोपर्यंत सदा सरवणकर यांच्यावर गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनबाहेरून हटणार नाही, अशी भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे सध्या दादर पोलीस ठाण्याबाहेर हायव्होल्टेज ड्रामा रंगला आहे. शिवसैनिक महेश सावंत यांनी सदा सरवणकर यांच्याविरोधात पोलिसांना लेखी तक्रार दिली होती. पण पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करुन घेतली नाही, असा आरोपही शिवसैनिकांकडून करण्यात आला.
दरम्यान, शिवसेनेच्या या आक्रमक पवित्र्यानंतर शिंदे गटही सक्रिय झाले आहेत. शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के आणि प्रवक्ते किरण पावसकर यांनी तातडीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली बाजू स्पष्ट केली आहे. सत्ता गेल्यामुळे शिवसेना बिथरली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला.
‘शिवसैनिकांनी माझ्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन चोरली’
शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे आणि शिवसैनिकांमध्ये शनिवारी मध्यरात्री पुन्हा वाद झाला होता. शिवसैनिक आपल्याला मारहाण करण्यासाठी आले होते, असे संतोष तेलवणे यांनी म्हटले. त्यावेळी शिवसैनिकांनी माझी दोन तोळ्याची चेन चोरली, अशी तक्रार तेलवणे यांनी दादर पोलिसांकडे दाखल केली आहे. शनिवारी मध्यरात्री मी माझ्या बिल्डिंगखाली उभा होतो तेव्हा उद्धव ठाकरे गटाचे ५० जण आले. तेव्हा मी एकटाच होतो. आले आणि म्हणाले बोल आता काय बोलतो?” पण मीसुद्धा या ५० जणांना पुरुन उरलो. मी त्यांना म्हणालो तुम्हाला हात लावायचा असेल हात लावा मला ठार मारा. जिवंत ठेवलात तर तुम्हा प्रत्येकाला घरातून उचलून नेईन, असे मी शिवसैनिकांना म्हटले. यावेळी तेलवणे यांनी सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोपही फेटाळून लावला. गोळीबार वाघावर करतात, शेळ्यांवर नव्हे, अशा शब्दांत तेलवणे यांनी शिवसैनिकांना डिवचले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.