किशोर पाटील, जळगाव

शेतात काम करुन घराकडे परतत असतांना महिलेला बिबट्या दिसला…बिबट्या आता आपली शिकार करेल या भितीने महिला पळत सुटली. पळता पळता नदीच्या किनाऱ्यावर जावून पोहचली. तिकडे भलामोठा पूर आलेली तापी नदी तर दुसरीकडे बिबट्या अशा कठीण परिस्थितीत महिला सापडली. मृत्यू डोळ्यसमोर उभा होता. मात्र ती हिंमत हरली नाही आणि खचूनही गेली नाही. बिबट्याच्या भितीने तिने पूर आलेल्या तापी नदीत उडी मारली. थोडं पोहता येत असल्याने काही अंतरावर पोहचली अन् हातात केळीचा वाहत येणारा खांब लागला. हाच केळीचा खांब या महिलेचा आधार ठरला. तब्बल १३ तास पाण्यात वाहत, पोहत महिला तब्बल ६० किलोमीटर अंतरावर जाऊन दुसऱ्या एका गावात नदीच्या काठावर पोहचली. तीही सुखरुप.. हे कुठल्या सिनेमाचं कथानक नाही, तर हा आहे… एका महिलेसोबत खरोखर प्रत्यक्षात घडलेला थरार. (A woman in Jalgaon saved her life by swimming for 13 hours in flood waters)

चोपडा तालुक्यातील कोळंबा येथील लताबाई दिलीप कोळी (वय ५५) असे या रणरागिणीचं नाव असून तिने तिच्या शौर्याने अन् धाडसाने जीव घ्यायला आलेल्या यमदूताला माघारी पाठवले आहे. या महिलेसोबत महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनच्या प्रतिनिधीने या महिलेची प्रत्यक्ष भेट घेवून तिच्याशी बातचित करत तिच्यासोबत घडलेला थरारक अन् अंगावर शहारे आणणारा प्रसंग जाणून घेतला. लताबाई कोळी दोन मुलं, सुना, नातवंडांसोबत कोळंबा गावात राहते, वर्षभरापूर्वीच त्यांच्या पतीचं निधन झालंय. गावापासून काही अंतरावर तापीनदीकाठावर त्यांचे शेत आहे. यावरच त्यांचा उदरनिर्वाह भागतो. लताबाई कोळी या नेहमीप्रमाणे शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी एकट्याच त्यांच्या मालकीच्या शेतात चवळीच्‍या शेंगा तोडण्यासाठी गेल्या होत्या.

रविवारच्या सुट्टीचा आनंद लुटताना जळगावात मोठी दुर्घटना; नदीत ४ तरुण-तरुणी वाहून गेल्या
एकीकडे समोर बिबट्या तर दुसरीकडे पूर आलेली तापी नदी… इकडे आड तिकडे विहिर…

सायंकाळ होत असल्याने लताबाई कोळी शेतातून घराकडे निघणार तोच त्यांच्या बाजूच्या केळीच्या शेतातून कुत्रा धावत पळत आला. कुत्र्यावरुन नजर हटत नाही तोच या कुत्र्याच्या मागे बिबट्या दिसला. बिबट्याला पाहताच लताबाई ह्या भितीने पळत सुटल्या. मात्र पळाल्या त्या नदीकडे..वरती टेकडीवर बिबट्या लताबाईंकडे पाहतोय. अन् लताबाई बिबट्याकडे…धावत लताबाई नदीच्या काठावर पोहचल्या. ईकडे भला मोठा पूर आलेली तापी नदी तर दुसरीकडे टेकडीवर बिबट्या..अजून काही वेळ घालवला तर बिबट्या आपली शिकार करेन या भितीने लताबाई यांनी पूर आलेल्या अथांग अशा तापीनदीत उडी घेतली.

धरणाच्या दरवाजातून धबधब्यासारख्या पाण्यासोबत खाली पडल्या, पण…

थोड थोडं पोहता येत असल्याने लताबाई पाण्यात तरंगल्या. यातच काही अंतरावर त्यांच्या हातात वाहत येणारा केळीचा खांब लागला. या केळीच्या खांबाला पकडून त्या पोहत राहिल्या पूराच्या पाण्यासोबत वाहत राहिल्या. मात्र त्यांनी हिंमत खचू दिली नाही. रात्रभर हातात केळीचा खांब, दोन्ही हात पाण्यात मारत लताबाई पोहत राहिल्या. काही अंतरावर गेल्यावर अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणाजवळ पोहचल्या.एका दरवाजातून तब्बल ३० ते ४० फूट उंच दरवाजातून जसा धबधबा कोसळतो, त्याप्रमाणे वाहत्या पाण्याबरोबरच लताबाई खाली पडल्या. मात्र केळीचा खांब सोडला नाही..त्यानंतर पहाटे साडेपाच वाचले. उजेड पडल्यावर लताबाई यांच्या जीव भांड्यात पडला. यात काही अंतरावर त्यांच्या पायाला वाळू लागायला लागल्यावर नदीचा काठ जवळच आहे, असे लक्षात आल्यावर त्या काठावर पोहचल्या.

Lata Sonawane : शिंदे गटाला झटका!, या आमदाराची आमदारकीच धोक्यात; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
तब्बल १३ तास पूर आलेल्या विशाल तापी नदीत..सर्व देव आठवले. सर्व देवांची नाव घेतली

तब्बल १३ तास पाण्यात वाहत, पोहत असतांना अनुभव लताबाई सांगत असतांना अंगावर काटा उभा राहतो. यादरम्यान पाडळसरे धरणाजवळ पाण्यात विसर्जन केलेली एक मूर्ती डोक्यावर पडली, त्यामुळे दुखापत झाल्याचेही लताबाई सांगतात. सर्व देव आठवले. सर्व देवांची नाव घेतली, त्यामुळे तोंड सुध्दा दुखून आलं.. पण हिंमत नाही हरले. आणि वाचले. माझा पुनजन्म झाला असून मी देवाचे..त्या तापीमाईने मला मरु दिले नाही, त्या तापीमाईचे व ज्या केळीच्या खांबांचा आधार मिळालो, त्या केळी देवताचे मी खूप खूप आभार असल्याचे लताबाई सांगतात तेव्हा त्यांचे डोळे भरुन येतात. जीवंत असेपर्यंत केळीच्या खोडाची, तापीमाईची पूजा करीन असंही यावेळी लताबाई सांगतात.

जळगावात राडा! उद्धव ठाकरे समर्थक महापौरांच्या घरावर हल्ला; दगड, पेटते सुतळी बॉम्ब फेकले
असा विक्रम करणाऱ्या लताबाई देशातील एकमेव महिला असाव्यात

आतापर्यंत प्रसिध्द अशा जलतरण पटूंनी अनेक विक्रम केले असतील, मात्र सामान्य व गरीब कुटुंबातील महिला की जिने तब्बल १३ तास रात्रभर पूर आलेल्या विशाल अशा तापी नदीत पाण्यात पोहत, वाहत जावून स्वत:चा जीव वाचविला. यात लताबाई हा विक्रम करणाऱ्या या देशातील एकमेव महिला असाव्यात यात शंका नाही. लताबाई कोळी यांच्याबाबतीत देव तारी त्याला कोण मारी…ही म्हण सार्थ ठरते. लताबाई यांनी दाखविलेल्या या धाडसाबद्दल, शौर्याबद्दल त्यांना महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनचा सलाम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here