मुंबई: पुण्यातील तळेगाव येथे नियोजित असलेला वेदांत आणि फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प गुजरातला गेल्यावरुन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर आगपाखड केली. हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार असल्याचे निश्चित झाले होते. वेदांत कंपनीचे मालक अनिल अग्रवाल यांनी ट्विट करुन तशी माहितीही दिली होती. पण सरकार बदलल्यानंतर एका महिन्यात अशा काय गोष्टी घडल्या की, ‘फॉक्सकॉन’ प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला, असा सवाल आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी उपस्थित केला. ते मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.
भाजप गुजरातचे हित जपण्यात व्यस्त, बडा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर जयंत पाटील संतापले, लागोपाठ ३ ट्विट
यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे हा प्रकल्प राज्याबाहेर गेला का, असा प्रश्न आदित्य यांना विचारण्यात आला. यावर आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, राज्यातील सध्याच्या व्यवस्थेवर कोणाचा विश्वास उरलेला नाही. रोज बदल्या होत आहेत. कोण कुठे जातंय ते कळत नाही, त्यामुळे काहीच कळेनासे झाले आहे. मुख्यमंत्री सगळीकडे गरागरा फिरत आहेत. पण आता त्यांनी मंत्रालयात बसून काम करण्याची गरज आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. ‘फॉक्सकॉन’ प्रकल्प राज्याबाहेर गेला असला तरी आता एअरबसचा एक प्रकल्प आणि क्युबिक कंपनीचा प्रकल्प हे महाराष्ट्रात येण्याच्या मार्गावर आहेत. आता किमान हे प्रकल्प तरी महाराष्ट्राबाहेर जाऊ नयेत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

महाराष्ट्राची पुन्हा उपेक्षा, बडा प्रकल्प गुजरातमध्ये, आदित्य ठाकरेंची भाजपवर सडकून टीका!
‘वेदांत’च्या प्रमुखांना हा प्रकल्प महाराष्ट्रातच आणायचा होता: सुभाष देसाई

या पत्रकारपरिषदेत माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही मागील सरकारच्या काळात झालेल्या सर्व वाटाघाटींची माहिती दिली. गेल्या वर्षभरात हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासंदर्भात चालना मिळाली. दाव्होस परिषदेत मी आणि आदित्य ठाकरे यांनी वेदांतचे प्रमुख अनिल अग्रवाल यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली होती. अनेक मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की, माझं समाधान झाले आहे. आम्हाला भारतात उद्योग आणायचा असेल तर महाराष्ट्रातच हा प्रकल्प स्थापन करु, असे त्यांनी म्हटले होते. इतकी सकारात्मक चर्चा झाली होती. तीन महिन्यांपूर्वी दिल्लीत ‘फॉक्सकॉन’चे अध्यक्ष तैवानवरुन आले होते. त्यावेळी आम्ही त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यांना कोणत्या सवलती, कोणत्या सुविधा द्यायच्या यावर चर्चा झाल्यानंतर त्यांनी तळेगाव हे ठिकाण अंतिम केले होते. केवळ कागदोपत्री व्यवहार बाकी होती. मध्यंतरी आमचं सरकार गेल्याने पुढील प्रयत्न थांबले. हा उद्योग महाराष्ट्राच्यादृष्टीने खूपच फायद्याचा होता. यामुळे इतर अनेक उद्योगांना फायदा झाला असता. परंतु, केंद्रातील सरकार ‘समर्थ’ असल्याने आणखी किती उद्योग अशाप्रकारे महाराष्ट्राबाहेर जाणार, असा खोचक सवाल सुभाष देसाई यांनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here