मुंबई: राज्यातील बहुचर्चित वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प हा गुजरातमध्ये जाणार असल्याची चाहुल लागताच महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे नेते आक्रमक झाले आहेत. या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले जात आहे. या वादात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी मंगळवारी संध्याकाळी ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले आहे. या ट्विटमध्ये राज ठाकरे यांनी हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला कसा गेला, याचा राजकारणापलीकडे जाऊन विचार करावा, असा सल्ला दिला आहे.
भाजप गुजरातचे हित जपण्यात व्यस्त, बडा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर जयंत पाटील संतापले, लागोपाठ ३ ट्विट
फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. हा एकूणच प्रकार गंभीर आहे. म्हणूनच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज्याला आर्थिक मागास करण्याचा डाव: अजित पवार

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याप्रकरणी मंगळवारी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी अजितदादांनी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणला जावा, अशी मागणी केली. तळेगांव येथील कंपनीच्या उभारणीसाठी आवश्यक असणारे इकोसिस्टिम, ऑटोमोबाईल व इलेक्ट्रीक हब, रस्ते, रेल्वे व एअर कनेक्टीव्हिटी, ‘जेएनपीटी’ बंदराशी असणारी कनेक्टीव्हिटी, उपलब्ध असणारे तांत्रिक मनुष्यबळ व महाराष्ट्र राज्याचे गुंतवणूक धोरण हे पोषक असल्यानं वेदांत ग्रुपनं तळेगांव येथील एक हजार एकर जागेची निवड केली होती. मात्र राज्यात सत्तांतर होताच महाराष्ट्राच्या हिताचा असणारा हा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरातमध्ये नेण्याचा घाट घातला जात आहे. हा प्रकल्प गुजरातमधील धोलेरा येथे प्रस्तावित केला असून महाराष्ट्रातील तळेगांवच्या तुलनेत ही जागा प्रकल्पाच्या उभारणीसाठी अगदीच सामान्य आहे. महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न असून महाराष्ट्राला आर्थिक मागास करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे राज्याचे ‘जीएसटी’चे सुध्दा मोठे नुकसान होईल, अशी शक्यता अजित पवार यांनी बोलून दाखवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here