औरंगाबाद जिल्ह्यातील गल्ले बोरगाव या गावातील एका व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह गावी आणत असताना खराब रस्त्यामुळे तो ट्रॅक्टर मधून न्यावा लागला. मात्र, ट्रॅक्टर चिखलात अडकल्यामुळे शेवटी ट्रॅक्टर मधला मृतदेह काढून बैलगाडी टाकावा लागला आणि तो घरापर्यंत न्यावा लागला असल्याचा प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील रस्ते दुरुस्त होत नसल्यामुळे मृतदेहांच्या नशिबी सुद्धा वनवास पाहायला मिळतोय.
याबाबतचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृतदेह ट्रॅक्टरमध्ये नेत असताना खराब रस्त्यामुळे ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली. या घटनेमुळे अखेरच्या प्रवासातही नरकयातना सोसाव्या लागल्याचे दिसत आहे. खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथील ही घटना आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण
औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद जवळील मत्तेवाडी येथील नागरिकांना आयुष्याच्या अखेरचा प्रवासही खडतर करावा लागत आहे. मत्तेवाडीवर जाण्यासाठी असणारा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला नसल्याने हा त्रास सहन करावा लागत आहे. मत्तेवाडी येथील ज्ञानेश्वर देवराम मत्ते यांचे आज पहाटे चार वाचेच्या सुमारास औरंगाबाद येथे उपचारादरम्यान निधन झाले.
त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गल्ले बोरगावपर्यंत त्यांना रुग्णवाहिकेत आणण्यात आले. मात्र, राहत्या घरी मत्तेवाडीचा रस्ता पूर्ण चिखलमय झाल्यामुळे त्यांचा मृतदेह ट्रॅक्टरमध्ये नेत होते. खराब रस्त्यामुळे ट्रॅक्टरची ट्ऱॉली पलटी झाली. यात सुदैवाने कुठलीही दुर्घटना घडली नाही. यानंतर मृतदेह बैलगाडीत नेण्यात आला. रस्ता खराब असल्याने अंत्यविधीसाठी येणाऱ्या नातेवाईकांची देखील मोठ्य प्रमाणात हेळसांड झाली. अखेरच्या प्रवासातही मृतदेहाला नरकयातना सोसाव्या लागल्याने स्थानिक नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.