मुंबई : वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प राज्याबाहेर केल्याने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. सरकारच्या अपयशामुळे हा प्रकल्प आपल्या हातून निसटला, असा आरोप महाविकास आघाडीकडून सत्ताधाऱ्यांवर केला जात आहे. यावर आता मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
‘वेदांता प्रकरणात मराठी माणसांमध्ये भ्रम निर्माण करण्याचं काम पेंग्विनसेनेच्या माध्यमातून जाणीवपूर्वक केलं जात आहे. आमचे सवाल थेट पेंग्विनसेनेला आणि पेंग्विनसेनेच्या प्रमुखांना आहेत. वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातमध्ये खेचून नेला, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. म्हणजे हा प्रकल्प महाराष्ट्रात आणला गेला होता, असं त्यांचं म्हणणं असल्याचं दिसत आहे. पण आमचा प्रश्न असा आहे की, हा प्रकल्प महाराष्ट्रात कधी आला होता? त्या प्रकल्पासाठी जमिनीचं अधिग्रहण कधी केलं होतं? तुमच्या सरकारने सर्व परवानग्या दिल्या होत्या का?’ असे प्रश्न विचारत यापुढे महाराष्ट्रात खोटं सहन केलं जाणार नाही, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे. महात्मा फुले यांच्या जीवनावर चित्रपट निर्मिती करणाऱ्या वादग्रस्त कंपनीला सत्तांतरानंतर मुदतवाढ
‘एकनाथ शिंदेंच्या बदनामीचा प्रयत्न’
‘केवळ तुमच्या मनातला मुख्यमंत्री झाला नाही आणि बाळासाहेब व आनंद दिघे यांचा एक सच्चा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला म्हणून तुम्ही त्याला बदनाम करत आहात. त्यामुळे माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की मी उपस्थित केलेल्या प्रश्नांना पेंग्विनसेना उत्तर देणार नसेल तर उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे,’ अशी मागणी शेलार यांनी केली आहे.
दरम्यान, ‘महाराष्ट्राला या प्रकरणातील सत्य कळालंच पाहिजे. वेदांताचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांनी ट्वीट केलं आहे. महाराष्ट्रामधील प्रकल्प आम्ही बाहेर नेला नाही, असं ते म्हणाले आहेत. तसंच दोन वर्ष महाराष्ट्र सरकारसोबत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे सरकारकडून वाटाघाटीची मागणी झाल्याने तर हा प्रकल्प आपल्यापासून दूर गेला नाही, अशी आम्हाला शंका आहे,’ असंही शेलार म्हणाले.