बीसीसीआयला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला. त्यामुळे आता जय शहा आणि सौरव गांगुली हे दोघेही बीसीसीआयमध्ये आपली दुसरी टर्म पूर्ण करू शकतात. पण आता गांगुली यांची अध्यक्षपद जय शहा यांना देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. पण मग गांगुली हे बीसीसीआयचे सचिव होणार का, तर नक्कीच नाही. कारण गांगुली कधी आपल्याला मिळालेल्या पदापेक्षा खालच्या पदावर कधीच उतरणार नाहीत. गांगुली यांचा आतापर्यंतचा प्रवास पाहिला तर नेहमीच त्यांच्या कार्याचा आलेख चढता राहिला आहे, त्यामुळे आता ते पुन्हा बीसीसीआयमध्ये काम करतील, असे वाटत नाही.
गांगुली हे आपल्या कामाच्या बाबतीत नेहमीच चोखंदळ असतात. त्यामुळे आता त्यांनी बीसीसीआयमधील मोठे पद भूषवले आहे. जर त्यांना बीसीसीआयमधील अध्यक्षपद मिळाले नाहीत तर ते बीसीसीआयमधील कोणतेही पद भूषवणार नाहीत. गांगुली यांना आता आयसीसीच्या अध्यक्षपदाची स्वप्न पडायला लागली आहेत आणि त्यांचे हे स्वप्न लवकरच साकार होऊ शकतं. कारण आयसीसीच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ आता संपत आला आहे. त्यामुळे गांगुली आता थेट आयसीसीवर जाण्याच्या तयारीत आहेत.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार १५ राज्यातील बोर्डांनी जय शहा यांना नवा अध्यक्ष करावे असे मत व्यक्त केले आहे. अधिकतर सदस्यांच्या मते करोनाच्या काळात आयपीएलचे यशस्वी आयोजन करण्यात जय शहा यांचा मोठा वाटा होता. याच बरोबर आयपीएलच्या मीडिया राइट्सने बोर्डाला ४८ हजार ३९० कोटी रुपयांची कमाई झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आता बीसीसीआयमध्ये निवडणुकीची तयारी सुरू आहे. बोर्ड लवकरच वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवणार आहे. बोर्डाच्या घटनेत बदल झाल्यानंतर राज्य बोर्डांना नव्याने निवडणुकीसाठी नोटीस काढली जाईल. बीसीसीआयच्या विद्यमान अधिकाऱ्यांचा ३ वर्षाचा कालावधी या महिन्यात पूर्ण होत आहे. यामुळेच पुन्हा निवडणूक होणार आहे.