वसईच्या भुईगाव समुद्रकिनारी १३ महिन्यांआधी एका महिलेचा शीर नसलेला मृतदेह आढळला होता. मात्र पोलिसांनी डीएनए तपासणी करून त्या माहितीच्या आधारे या हत्येच्या गुन्ह्याची उकल केली. या प्रकरणी या महिलेच्या पतीला अटक करण्यात आली.

सानिया शेख आणि तिचा पती आसिफ शेख (३२ ) हे आपल्या चार वर्षांच्या मुलीसह नालासोपारा येथे राहत होते. मात्र त्यांच्यात विविध कारणांवरून वाद होत होते. या वादातून अखेर सानियाची हत्या २१ जुलै २०२१ रोजी करण्यात आली होती. हत्येनंतर शीर वेगळे करून मृतदेह कळंब येथील समुद्रात एका बॅगेत भरून टाकण्यात आला होता. २६ जुलैला भुईगाव किनारी हा मृतदेह वाहून आला होता. त्यानंतर हे शेख कुटुंब मुंब्रा येथे स्थायिक झाले. सानियाच्या घरच्यांचा सानियाशी संपर्क करण्याचा या दरम्यान प्रयत्न सुरू होता. वर्षभर वारंवार प्रयत्न केल्यानंतर अखेर मुंब्रा येथील पत्ता त्यांना सापडला. त्यावेळी सानिया बेपत्ता असल्याचे कळताच २९ ऑगस्ट २०२२ रोजी आचोळे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. वसई पोलिसांनी याची दखल घेत तिच्या मुलीचे डीएनए तपासले. हे डीएनए सानियाशी जुळले. त्यामुळे पोलिसांनी तिच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तपासाअंती पतीनेच हत्या केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याला तत्काळ अटक करण्यात आली, अशी माहिती वसई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कल्याण करपे यांनी सांगितले.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.